शेवटी देवच मदतीला धावुन आला

शिर्डी संस्था 51 करोड
सिद्धिविनायक संस्था 5 कोटी
तिरुपती बालाजी मंदिर ट्रस्ट 200    कोटी
माता वैष्णोदेवी मंदिर ट्रस्ट 7 करोड
श्रीमहावीर हनुमान मंदिर पाटणा 1 करोड
महालक्ष्मी मंदिर करवीर 2 कोटी
श्रीखाटूश्यामजी मंदिर, राजस्थान 11 लाख
श्रीसालासार बालाजी धाम, राजस्थान 11 लाख
जिनमाता मंदिर राजस्थान 5 लाख

अजूनही कित्येक मंदिरे लॉक डाऊनच्या काळात सरकारला आर्थिक बोजा उचलावा लागू नये आणि गरिबांना दोनवेळा पोटभर खायला मिळावं यासाठी झटत आहेत.. स्वामी नारायण मंदिरे बंद आहेत, पण रोजच्या रोज गरिबांना अन्नदान सुरूच आहेत..

देव पळून गेला, संकटाच्या काळात देव मदतीला येत नाहीत, मंदिरात दान करू नका म्हणणाऱ्या लोकांना, मंदिरात भाविक आपापल्या कमाईतून सर्व खर्च भागवून, सर्व कर भरून पुन्हा मंदिरात दान करतात.. मंदिर देखील आलेल्या पैशावर कर भरून उर्वरित पैशाचा विनियोग भाविकांच्या सुखसोयीसाठी करतातच, वर जेव्हा देशावर संकट येते, तेव्हाही मदतीला पुढं येतात..

अशावेळेस लोकांना धीर देण्याचं सोडून, आपल्याला काय करता येईल हे बघून त्यादृष्टीने मदत करायची सोडून घरातच बसून देवांच्या नावाने बोट मोडणाऱ्या लोकांनी देवाकडून आणि त्याच्या भक्तांकडून काहीतरी शिकावं..

तस तर अभक्त किंवा नास्तिकच भक्तांहून जास्त आस्तिक असतात.. जेव्हा काही संकट येते, तेव्हाच यांना देव कुठं आहे? हा प्रश्न पडतो, तो मदतीला यावा यासाठी त्यांचा धावा सुरू होतो.. आस्तिक लोकांना भगवंत आपल्यासोबतच आहे याची कायमच जाणीव असते..

माणूस जन्माला आला म्हणजे तो कधीतरी मरणारच याचीही भक्ताला जाणीव असते, कोणत्याही देवाने माझी भक्ती करा म्हणजे तुम्हाला मरण येणारच नाही, अस सांगितलेलं नाही, हेही त्याला माहित असत.. नास्तिक, देवद्वेष्टे मात्र याही बाबतीत बालवाडी नापासच असतात..

सर्वात महत्वाची बाब म्हणजे भक्त किंवा अस्तिकाना काहीही झालं तरी ती भगवंताची इच्छा मानून आलेल्या परिस्थितीशी लढण्याची सकारात्मक वृत्ती असते.. नास्तिक या शब्दातच आधी न असल्याने असली नकारात्मक लोक संकटांच्या काळात देवाच्या, धर्माच्या, लोकांच्या नावाने रडण्यासाठी रुदाली बनून पुढेच असतात.. 😊😊😊

🚩🚩 आदेश 🚩🚩


~~~~~
उत्तर

*शेवटी देव नव्हे, देवस्थान (ट्रस्ट)  मदतीला धावून आले? उशिरा का होईना लोकलाजेस्तव (जास्त शक्य असताना मूठभर) दान दिले.*

कोरोनाव्हायरस समोर कोणाचेही काहीही चालत नाही हे सिद्ध झालेलेच आहे व सर्वांनी ते मान्य ही केले आहे. त्याला नियंत्रणात आणण्यासाठी विज्ञानाची मदत घेऊन सरकार झटत आहे. जेव्हा केव्हा औषध वा लस शोधली जाईल तेव्हा ती वैज्ञानिक संशोधनानेच शोधतील हेही खरच. कितीहि ऊपास-तापास केले, मंत्र तंत्र, नवस-सायास केले, नमाज, प्रेयर वा अन्य काहीही ऊपासना केली तरीही जर कोरोनाचा संसर्ग झाला तर बाधा होणारच. ईश्वर, अल्लाताला  वा इशामसी आपल्या भक्ताला वाचवू शकणार नाहीत हेही खरेच. 

लॉक-डाउन काळात लाखो लोकांचे छोटे धंदे बंद पडल्याने व हातावर पोट असलेल्या लोकांचे हाल होत असल्याने, देवस्थाने आपल्या अब्जावधी रुपयांच्या संपत्तीतील मोठा वाटा अशा लोकांच्या मूलभूत गरजांसाठी खर्च करील अशी अपेक्षा होती. कारण हे पैसे भक्तांचेच आहेत जे त्यांनी दान म्हणून अर्पण केले होते. जेंव्हा सगळीकडून जोरदार टीका होऊ लागली तेंव्हा कुठे देवस्थाने (देव नव्हे, देवस्थाने. कारण हे आर्थिक व्यवहार देवस्थाने सांभाळतात) जागी झाली. आणि काय केले?

अब्जावधी रुपयांच्या संपत्तीच्या राशींवर बसलेल्या या देवस्थानांनी त्या पैकी मूठभर वाटेल अशी रक्कम लोकांसाठी देणगी म्हणून दिली. असो, उशिरा का होईना व अत्यल्प का होईना जी काही देणगी दिली त्याचे स्वागतच आहे. असेच सर्व धर्मांच्या देवस्थानांनी, जिथे जिथे लोक मोकळ्या हाताने दक्षिणा देतात, त्यांनी पुढे यावे, येतीलही व कोरोना संकटाला तोंड देण्यासाठी भरघोस मदत करावी. काही ऊद्योगपती, खेळाडूही पुढे येतील.

यात अत्यंत लज्जास्पद बाब म्हणजे आतापर्यंत गप्प बसलेले काही देवभक्त या देणग्यांचे आकडे येताच जागे झाले आहेत व ते आकडे फेकून अन्य धर्मीय देवस्थानांना, संस्थांना, संघटनांना तुच्छ लेखत आहेत व तुम्ही किती दान दिले म्हणून प्रश्न करीत आहेत व देवस्थानांनी दिलेल्या दानांचा माज दाखवत आहेत. असा माज ती देवस्थाने सुद्धा दाखवीत नसतील. अशा टुकार देवभक्तांना हे सांगावेसे वाटते की दान हे केवळ पैशातच द्यायचे असते असे नव्हे. या कठीण प्रसंगात ज्यांना शक्य आहे अशा संघटना, ट्रस्ट, संस्था, लोक यथाशक्ती पैसे, वस्तु किंवा सेवा रूपाने दान करीत आहेत. पण पैशाचा माज डोक्यात घुसलेल्या काही भक्तांना त्याचे मूल्य कळणारच नाही. कारण अनेक संघटना, लोक दानाचा गाजावाजा करत नाहीत. दान, देणगी याची तुलना करणे हे अत्यंत घृणास्पद आहे याची नोंद या विकृत भक्तांनी घ्यावी व असल्या पोस्ट करणे टाळावे. अशी तुलना करून ते स्वतःच्या धर्माच्या दानाच्या परंपरेची टिंगल उडवीत आहेत हे लक्षात घ्यावे.

काही मूर्ख भक्त विनाकारण केवळ अंनिसला लक्ष्य करीत आहेत. त्यांना हे सांगावेसे वाटते की विविध जिल्ह्यात जिल्हाधिकार्‍यांच्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेक कार्यकर्ते स्वयंसेवक म्हणून काम करीत आहेत, अनेक कार्यकर्त्यांनी देणग्या दिल्या आहेत, कोणी धान्य व खाद्यपदार्थ दान देत आहेत. त्याची यादी इथे दिली तर पानेच्या पाने पुरणार नाहीत. बरे अंनिसवाले अंधश्रद्धा निर्मूलनाचे काम पदरमोड करून वर्षानुवर्षे करत आहेत व आताही तशीच सेवा, अन्य दान देत आहेत. तेंव्हा तुमचा देवस्थानाच्या पैशाचा माज तुमच्याजवळच ठेवा. देवस्थानाच्या पैशावर उड्या मारण्या ऐवजी स्वतः ही दान करा व केले असेल तर त्या पावतीचा लगेचच फोटो टाकुन दुसऱ्यांनाही दानासाठी प्रेरीत करा.

देश अत्यंत कठीण परिस्थितीतून जात आहे. अशा वेळी आपले पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या आदेशांचे तंतोतंत पालन करावे. स्वयंसेवक म्हणून काम करावे, लोक बाहेर पडणार नाहीत याची काळजी घ्यावी. माझे दान मोठे तुझे दान छोटे असल्या पोरकट तुलना करीत बसू नये.
- चला उत्तर देऊ या टीम

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?