RSS का विभाजित झाली नाही?

100 वर्षापेक्षा जास्त वर्षे होऊन ही RSS कधी गटात विभाजित झाली नाही
ध्येयवादी माणसे म्हणून मी त्यांच्याकडे पाहतो .चुकीचे ते आपल्यासाठी आहेत , पण ते त्यांच्यासाठी योग्य आहेत .
ते त्यांची व्यवस्था टिकवण्यासाठी घेत असलेली मेहनत कौतुकास्पदच  आहे . हो
उलट आमच्याकडे घ्या, पटत नाही किंवा वैचारिक वाद झाले की दुसरी संघटना काढली जाते. हा फरक आहे त्यांच्यात आणि आमच्यात .
आमच्याकडे ध्येय नाही. आमच्याकडे प्रसिद्धी साठी काम केली जातात .मला मोठा म्हणा  म्हणून काम केली जातात . rss चा पुढील नेता कोण हे माहिती नसते पण आमच्याकडे पटले नाही की  विभाजित होऊन स्वतः नेता म्हणून  जाहीर केले जाते .
ही परिस्थिती आहे  आपली. आपण rss वर टीका जरुर करतो पण काम करण्याचे तंत्र काही शिकत नाही . याला आपण दोषी ठरतो हे ही वास्तव आम्ही समजले पाहिजे .
Rss सारखी आमची काम करण्याची पद्धत नाही .
त्यांच्यातला तो संयम , त्यांच्यातील ती जिद्दही आमच्यात नाही , हे प्रामाणिकपणे आम्ही कबूल केले पाहिजे .
आजची परिस्थिती काय?  rss  ने सत्तेत येण्यासाठी अनेक रचनाबद्ध काम केलेली आहेत. त्यातला एक अंश ही काम आमच्याकडे झालेले नाही. rssने सत्तेत येण्यासाठी धार्मिक बेस पक्का केलाय .आम्ही मात्र आमचा धार्मिक इतिहास मातीत गाडून टाकलाय.
लोकांना वाटते की आपण चळवळीत काम करतोय. पण नाही आपण आपला स्वार्थ साधत आहोत . का तर , आपल्याला कोणी तरी मोठे म्हणावे आपले कौतुक करावे यासाठीच काम केले जाते .
म्हणूनच आमच्याकडे फुटीरतावादी लोकांचा भरणा झाला .
 आमचाच इतिहास माहिती नसल्याने ही अडचण आहे .
आमची फुटीरतावादी लोक निर्माण होण्याला कारणीभूत आम्हीच .
काही लोकांना वाटत असेल की आपण प्रामाणिक काम करतो. पण जिथून आपण शिकतो त्यालाच जेव्हा लाथ मारून जातो तेव्हाच आपला प्रामाणिकपणा लयास गेलेला असतो
Rss दोन झाल्या नाहीत. का नाही झाल्या कारण त्यांचे ध्येय पक्के होते .आमच्याकडे का नाही होत ? कारण आम्ही ध्येयासाठी नाही , स्वतःच्या नावासाठी काम करतो .
शत्रू बलाढ्य आहेच , पण घराचे भेदी घराची वाट लावत असतात
साहित्याचा आधार घ्यावा तर रावण एवढा बलाढ्य कोणीच नव्हता पण मारला गेला . तो घरच्यांमुळे आणि बहुजन चळवळीत हेच पाहायला मिळत असलेली उदाहरणे आहेत . आमचे लोक हारतात ते घरच्या लोकांमुळेच .
 ज्या दिवशी आमचा सामाजिक , सांस्कृतिक , धार्मिक  बेस पक्का  होईल तेव्हाच परिवर्तन शक्य आहे .नाही तर येरे माझ्या मागल्या .
आताच्या पिढी ला किती ही समजावून सांगा त्यांना तुमच्या समजावण्याला तुमचा इगो समजतात .
 कारण तुमच्या कामात त्यांना तुमचा इगो दिसतो , अहंकार दिसतो .तेंव्हा हा इगो नष्ट करणे सगळ्यात पहीले आवश्यक आहे.
Rss ने आजवर त्यांच्या लाखो पूर्णवेळ कार्यकर्त्यांची  साधी ओळख ही या दुनियेला करून दिलेली नाही .आता त्या लाखो कार्यकर्त्यांनी काम कसे केले असेल ?
Rss ने आजवर त्यांच्या अनेक सेवकांची नाव पण कधी मीडियात वा कुठे दिलेली नाहीत. त्यांच्या कामाचा साधा उल्लेख ही कुठे केला जात नाही , तरी सकाळी साडे चार ला शिस्तीचे धडे घेत आपण उठायच्या आत ते त्यांची कामपूर्ण करतात . धडा आम्ही काय शिकला पाहिजे हे यातच सामावलेले आहे .
आम्ही उठायच्या आत त्यांनी त्यांची काम केलेली असतात. म्हणून एक गोष्ट लक्षात घ्या आम्ही एक पाऊल चालतोय तर ते 10 पाउल चालतात .आम्हाला 100 पाऊले पुढे चालणारी माणसे  तयार करावी लागतील
आणि ती माणसे या पिढीत तरी कुठं दिसत नाहीत .
प्रामाणिकपणे काम करणा-या माणसांच्या मनातही त्याचा अहंकार कसा जागृत करायचं हे कसब आपल्या लोकात चांगले आहे . अरे तुझेच काय अडले आहे का ? तुझ्यासोबतच असे का केले जाते ? इतरांच्या बाबतीत असे होताना दिसत नाही . अरे तू पण काम करतो ना ,  तुझे फोटो कुठे दिसत नाहीत . तू एवढी मेहनत घेतो , तुझे काहीच ऐकून घेतले जात नाही . अरे तुझा अपमान केला जातो तरी  तू त्यांच्यात च कसा काम करतो? असे प्रश्न निर्माण करून प्रामाणिक काम करणाऱ्या लोकांच्यात तो इगो तयार केला जातो. स्वाभाविक त्यावेळी मग स्वतःचा इगो हा माणसाला काही ही करण्यास भाग पाडतो व तो विभक्त होण्याच्या वाटचाली कडे मार्गक्रमण करतो .
आता मला सांगा कां चळवळी विभक्त होणार नाहीत ?
आणि जे लोक दिखावा करतात की , आम्ही तुमच्या सोबत काम करू, तुम्ही फक्त हाक द्या .अश्या लोकांचे जेव्हा प्रसंग येतो तेव्हा त्यांच्यातला उत्साह  उणा झालेला दिसतो . म्हणून या पिढीत तो विचार रुजतांना दिसत नाही .
आपण प्रयत्न खूप करतो पण लोकांना त्या प्रयत्नात ही अहंकार दिसून येईल .
पुन्हा rss का विभागली नाही यावर चिंतन तेही कृतिशील असावे . लक्षात येईल .
आम्ही काय करतो ?
आम्ही केवळ गोंधळ घालतो. rss कृतिशील काम करते .
आम्ही फक्त दिखावा करतोय. rss त्यांची काम कोणताही दिखावा न करता करतेय .
आम्हाला जागे करावे लागते. त्यांची माणसे त्यांनी जागी केलीत. आम्ही फक्त एकमेकांचे दोष पाहतो . ते केवळ काम पाहतात व तशी माणसे तयार करतात .
आम्ही केवळ संघटना पाहतो ते त्यांचे ध्येय पाहतात .
म्हणून च rss आजवर दोन तुकड्यात कधी विभागली नाही पण आम्ही बहुजन चळवळीचे सतराशे साठ भाग करून बसलो .
Rss त्यांच्या कामावर प्रामाणिक आहे .आम्ही मात्र तिथं  कुठेच नाही .
वाटत असेल आम्हाला आम्ही प्रबोधनाची चळवळ राबवतो . पण ती  समाज सुधारणावादी आहे जी शतकानुशतके चालतच आलीय. बदल काहीच नाही .
आता आपण विचार करावा आम्ही काय करतो ? कां विभागतो आम्ही चळवळ ? कां  आम्ही चळवळीला विभाजित करून कमकुवत करतो? कां चळवळीला आम्ही विभागून आमच्या  पिढीचे नुकसान करतो?  यावर विचार तर झाला पाहिजे .

(टीप : वरील विषय हा गंभीर असून पावले व्यवस्थित न टाकल्यास भविष्य अंधारात आहे एवढे नक्की .)
रवींद्र मीनाक्षी मनोहर यांच्या वॉल वरून संपादित.



*100 वर्षापेक्षा जास्त वर्षे होऊन ही RSS कधी गटात विभाजित झाली नाही.* या लेखावर प्रतिक्रिया:
-उत्तम जोगदंड

व्हाट्सअॅप मध्ये फिरत असलेला ‘रवींद्र मीनाक्षी मनोहर यांच्या वॉल वरून’ आलेला वरील लेख वाचनात आला. त्याला भरूपूर लाईक्स सुद्धा आलेल्या आहेत. आंबेडकरी चळवळीची झालेली वाताहत पाहून त्यांना जे दुःख झाले आहे त्यामुळे त्यांनी हा लिख लिहलेला असावा. त्यांच्या तळमळीबद्धल, प्रामाणिकपणाबद्धल अजिबात शंका नाही. परंतु आपले विचार व्यक्त करताना त्यांनी नकळत जो वैचारिक गोंधळ घातला आहे त्यावर बोलणे भाग आहे. नाहीतर आजकाल व्हाट्सअॅप युनिव्हार्सिटीचा बोलबाला असल्याने हा गोंधळ समाज-मान्य होऊ शकतो.
१) आरएसएसची स्थापना २७ सप्टेंबर १९२५ रोजी झालेली आहे. त्यामुळे ही संघटना ‘१०० वर्षापेक्षा जास्त ....’ जुनी नाही. हा तांत्रिक मुद्दा असला तरी यावरील माहिती उपलब्ध असल्याने अशा चुका आजच्या काळात तरी होऊ नयेत. तरीही या बाबीकडे दुर्लक्ष करून पुढे जाऊ या.
२) लेखकांनी आरएसएस विषयी म्हटले आहे की हे लोक ध्येयवादी आहेत, ते व्यवस्था टिकविण्यासाठी जी मेहनत घेतात त्याचे कौतुक केले आहे. आरएसएसचा पुढील नेता कोण हे माहिती नसते. त्यांचे काम करण्याचे तंत्र, पद्धत आपण काही शिकत नाही, वगैरे वगैरे.  परंतु लेखक हे विसरतात की आरएसएस ही फॅसिस्ट संघटना आहे. त्यांनी काही एक ध्येय समोर जरूर ठेवले आहे. पण ते सध्या करण्यासाठी ते कोणत्याची थराला जातात. तिथे अंतर्गत लोकशाहीला, व्यक्तीगत विचारांना, स्वतःचे डोके चालविण्याला, अभिव्यक्तीला, सत्याला स्थान नसते.  वेगवेगळी सत्ताकेंद्रे ताब्यात घेऊन त्या आधारे दमणतंत्र वापरुन, खोटेपणाचा वापर करून, विरोधकांना नेस्तनाबूत करून टाकून आपला एकतंत्री, एकछत्री अंमल करणे हे त्यांचे लक्ष्य आहे. ते साध्य करण्यासाठी आणि लोकांचा बुद्धिभेद करण्यासाठी ते भेदनीतीचा (धार्मिक, राजकीय, सामाजिक, आर्थिक इत्यादि) क्रूरपणे हिंसात्मक अंमल करतात. प्रसार माध्यमातून, कुजबुजीतून खोटा मजकूर खराच वाटेल अशा पद्धतीने आपल्या संलग्न गटांकडून पसरवून आपापसात द्वेष, तिरस्कार निर्माण करतात.  ही त्यांची कार्यप्रणाली आहे. तिचे अनुकरण आंबेडकरवादी लोकांनी करावे असे लेखकांना वाटते आहे काय?
३) आरएसएस आणि एसएसडी (समता सैनिक दल) यांची तुलना करताना लेखक म्हणतात की एसएसडीची कार्यप्रणाली राबवून आरएसएस सत्तेत बसलीय. याचा अर्थ असा होतो की एसएसडी आणि आरएसएस यांची कार्यप्रणाली एकच आहे. हा दावा दिशाभूल करणारा आहे कारण:   
अ) ही एसएसडीला कॉम्प्लिमेंट दिली आहे की शिवी दिली आहे असा प्रश्न पडतो. कारण, आरएसएस सारखी फॅसिस्ट प्रणाली डॉ. बाबासाहेब यांनी एसएसडीसाठी निर्माण करणे केवळ अशक्य आहे. 
आ) आरएसएस ही सप्टेंबर १९२५ मध्ये स्थापन झाली तर एसएसडी मार्च १९२७ मध्ये. मग एसएसडी स्थापन व्हायच्या आधीच त्यांची कार्यप्रणाली आरएसएस ने कशी काय उचलली? 
४) लेखक म्हणतात की बौद्ध समाज एकसंध असता तर अॅड बाळासाहेब आंबेडकर सोलापूर येथून हरले नसते. हा दावा हास्यास्पद आणि भावनात्मक  वाटतो. कारण २०११च्या जनगणणेनुसार तिथली बौद्धांची लोकसंख्या १.६२% आहे. त्या प्रमाणात मतदार असतील असा अंदाज करू या. ही एवढी लोकसंख्या एकत्र झाली असती तरी बाळासाहेब कसे जिंकले असते? आकडेवारी पुढील साईटवरून  घेतली आहे.  (https://www.censusindia.co.in/towns/solapur-population-solapur-maharashtra-802856)
५) बाळासाहेब वंचित बहुजन आघाडी तर्फे लढले होते. त्यांना अनुसूचीत जाती जमातीच्या १६.४% लोकांनी एकमुखी पाठिंबा दिला तरी एकूण १७.६६% होतात. हा आकडा निवडणूक जिंकून देणारा तरी दिसत नाही. तेही मतांचे ध्रुवीकरण धार्मिक आधारावर झालेले असताना! 
६) नंतर लेखकांनी राजकीय प्रश्नाकडून धार्मिक प्रश्नाकडे कोलांटी उडी मारलेली दिसत आहे आणि या प्रश्नाला बौद्ध विरुद्ध आरएसएस असा रंग द्यायचा प्रयत्न केला आहे. ते असेही म्हणतात की धर्मांतर होणे आवश्यक आहे. हाच खरा उपाय आहे धम्म रुजवण्याचा. कशाचा कशाला मेळ लागतोय का? आणि बौद्ध धम्म वाढण्याचा आणि आरएसएसला थोपविण्याचा काय संबंध? धार्मिक (आणि नंतर जातीय) ध्रुवीकरण हा आरएसएसचा अजेंडा उचलावा असे लेखकांना वाटते आहे काय? खरे तर हा विषय बौद्ध विरुद्ध आरएसएस असा नसून समस्त पुरोगामी, धर्मनिरपेक्ष, डावे, समतावादी, संविधानवादी लोक विरुद्ध आरएसएस असा आहे. परंतु या व्यापक प्रश्नाला लेखक अत्यंत संकुचित रूप देत आहेत आणि स्वतःला आणि बौद्ध धम्मीय लोकांना वरील सर्व पुरोगामी लोकांपासून वेगळे पाडीत आहेत. आरएसएस विरोध करण्यासाठी व्यापक आणि सर्वसमावेशक आंदोलनाची गरज आहे हे लेखकांनी लक्षात घ्यायला हवे.   
७) डॉ. बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाणानंतरच्या नेतृत्वाने बौद्ध धम्माला अक्षरशः महारांचा धर्म केल्याचे दिसत आहे. हे ऐकायला कटू वाटेल, क्षमस्व. परंतु हे सत्य नाकारता येत नाही. पूर्वास्पृश्य असलेल्या अन्य किती जातीपर्यन्त (खरे तर सगळ्या महारांपर्यंतसुद्धा)  हा धर्म पोहोचला आहे याचे चिंतन बौद्ध नेतृत्वाने करणे गरजेचे आहे. आदिवासींची तर बातच सोडा. त्यांचा खरे तर कोणताही धर्म नसताना सुद्धा त्यांना ‘वनवासी’ बनवले गेले आहे आणि ‘वनवासी आश्रम’च्या मार्फत त्यांचे ‘हिंदुकरण’ झाले आहे. महाराष्ट्राबाहेर किती बौद्ध धम्म गेला हे तर विचारायलाच नको. भारतातील एकूण बौद्ध लोकसंख्येपैकी ७७.३६% बौद्ध केवळ महाराष्ट्रात आहेत. म्हणजे उरलेले २२.६४% बौद्ध महाराष्ट्राबाहेर आहेत. यात दार्जिलिंग, सिक्किम, लडाख इत्यादि उत्तर भारतातील बौद्धांचा समावेश होतो. त्यांचा बौद्ध धम्म आणि महाराष्ट्रातील बौद्ध धम्म यात बराच फरक आहे.  हा बौद्ध नेतृत्वाने महाराष्ट्राबाहेर पाडलेला उजेड आहे. बरे, महाराष्ट्रातल्या बौद्धांची तरी काय स्थिति आहे? भारतीय बौद्ध महासभा, बौद्धजन पंचायत समिती, त्रैलोक्य/त्रिरत्नवाले हे प्रकार आहेत. काय बोलणार आता?
८) आरएसएसची कार्यपद्धती, त्यांच्या कार्यकर्त्यांची शिस्त वगैरे बाबतीत बोलताना लेखकांना शब्द पुरत नाहीत. परंतु त्यांचे कार्यकर्ते हे एखाद्या रोबोट प्रमाणे प्रोग्राम केलेले असतात. ब्रेनवॉश केलेले असतात. अगदी तालीबानी किंवा तत्सम अतिरेक्यां प्रमाणे, धर्माच्या नावाने! तालिबान्यांच्या हाती शस्त्रे असतात यांच्या हाती ती समोर दिसत नाहीत एवढेच. यांचे ध्येय धर्मरक्षण असते. आणि यांचा धर्म म्हणजे वर्ण/जातीवर आधारित ब्राह्मणी धर्म. मग बौद्ध धम्माचे रक्षण करणारे असे रोबोट आपण तयार करावेत असे लेखकांचे म्हणणे आहे काय?
९) खरे तर आपण व्यक्तिस्वातंत्र्य, लोकशाही आणि संवैधानिक मूल्यांवर विश्वास ठेवायला हवा. वेगळे मत असणे हे केवळ लोकशाहीसाठीच नव्हे तर, विकास, वैज्ञानिक प्रगति, सामाजिक प्रगति यासाठी पोषक असते. ते जिवंतपणाचे लक्षण आहे. हे नसल्यामुळे भारतवर्ष शतकानुशतके अंधारयुगात वावरत होते, इथे कोणीही येऊन राज्य करून जात होते. आता आपण परत तिकडेच जाणार आहोत काय? आपल्याला लोकशाही, स्वातंत्र्य, अधिकार काय असतात हे माहितीच नव्हते. आता ते मिळालेत तर पचायला जड जात आहेत. म्हणून लेखकाला जी बेशिस्त, बेजबाबदारपणा वगैरे दिसते (ते खरे ही आहे म्हणा) आहे, त्यावर उपाय म्हणजे आपल्यातील वैगुण्ये घालवणे हा आहे, परत अंधारयुगात जाणे हा नव्हे.
१०) लेखक म्हणतात, ‘आम्ही प्रबोधनाची चळवळ राबवतो पण ती  समाज सुधारणावादी आहे जी शतकानुशतके चालतच आलीय बदल काहीच नाही’. हे म्हणणे बिनबुडाचे आहे. स्वातंत्र्‍यानंतरच्या ७० वर्षांचा इतिहास डोळ्याखालून घातल्यास बदल झालेत, अगदी सर्वांगीण नसले तरी, हे नक्कीच दिसेल. आपल्या या आधीच्या दोन पिढ्यांचे सामाजिक जीवन आणि आताच्या पिढीचे जीवन पाहील्यास हे लक्षात येईल. लेखकांच्या हे लक्षात येत नाही की कोणतीही समाज-परिवर्तनाची चळवळ ही दीर्घकाळ चालणारी असते आणि बदल धीम्या गतीने होत असतात.  कारण भारतीय बहुजन समाज हा हजारो वर्षांपासून गुलामीच्या मानसिकतेतच वावरलेला आहे. त्याची विचारशक्ती खुंटविलेली आहे. म्हणून तर या कोट्यवधी लोकांवर आधी ब्राह्मणी व्यवस्थेने, नंतर मुस्लिम/मोगलांनी आणि केवळ काही हजार इंग्रजांनी राज्य केले. आणि आता बाबासाहेबांनी आणलेल्या समता, स्वातंत्र्य, बंधुभावावर आधारित लोकशाहीला मागे सारून परत ब्राह्मणी व्यवस्था स्थापित होत आहे.

एकंदरीत या लेखातून असा निष्कर्ष काढला जाऊ शकतो  की ‘त्यांची’ जशी आरएसएस आहे तशीच ‘बौद्धांची’ सुद्धा आरएसएस-सदृश संस्था असावी.  परंतु त्याची काहीच गरज नाही.

आरएसएसविरोधासाठी बौद्धांना अन्य पुरोगामी शक्तींपासून वेगळे काढणे हे खरे तर पुरोगामी शक्तीत  फूट पडण्यासारखे आणि आरएसएसची शक्ति वाढविण्यासारखे आहे. तेंव्हा, आधी बौद्ध, बौद्ध करीत बसण्यापेक्षा बाबासाहेबांना अभिप्रेत सर्वसमावेशक भारताचे, समाजाचे स्वप्न पहावे आणि त्या दिशेने काम करावे. लोकशाही, ‘वेगळे मत’ याचा सन्मान करावा. आपल्या घरात सुद्धा सगळ्यांची वेगवेगळी मते असतात. तरीही आपण सामंजस्याने एकत्र राहतोच ना. तसाच दृष्टीकोण समाजाच्या बाबतीत ठेवावा.

आरएसएसने आपले रंग दाखवायला सुरुवात केली आहे. त्या झटक्याने सर्व जागे झाले तर ठीकच. नाहीतर आपल्या कर्माची फळे भोगतील आणि नंतर जागे होतील. इगो वगैरे सर्व पळून जाईल. बाबासाहेबांनी यांना स्वातंत्र्य, समता, बंधुभाव, लोकशाही वगैरेची चव चाखायला दिली आहे. समाज जागा झालेला आहे. शंभर वर्षांपूर्वी जी सामाजिक स्थिति होती तशी राहिलेली नाहीये.    बाबासाहेबांनी पेरलेले बीज कधी ना कधी उफाळून वर येईल आणि त्या शक्तीला पराभूत करेल. फक्त सामंजस्य, ऐक्य, विचारातील स्पष्टता हवी.


टिप्पण्या

  1. सर,
    तुमचा blog अतिशय सुंदर आहे,मला बऱ्याच posts खूप आवडल्या मीही अशाच प्रकारच्या लेखनाचा प्रयत्न करत आहे. तरी मार्गदर्शन असावे. माझ्या ब्लॉगला भेट देऊन बघू शकता मो.क्र.9028570899
    http://zhatkaa.blogspot.com

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय पूर्वग्रह दूषित दृष्टीकोनातून RSS वर टीका केली आहे. RSS बौद्ध पंथाला हिंदू धर्माचा एक भागच मानते.. आणि हे सो कोल्ड पुरोगामी RSS ला शत्रू मानतात.. आज रामनाथ कोविद हे दलित भारताचे राष्ट्रपती आहेत .. कोणत्यातरी दलित संघटनेकडून हे शक्य झाले असते का?

    शक्य झाले तर हा गैरसमज काढून टाका.. तुम्ही आमचेच आहात आणि कायमच असाल .. कितीही विखारी लेखन केले तरीही ! काळाच्या कसोटीवर हे सिद्ध होईलच !

    उत्तर द्याहटवा
  3. त्यांना मिळणारी वागणूक खरंच सन्माननीय आहे ?

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?