औक्षण, ऑरा, तेजोवलाय वगैरे

🍁🍁

 तेजोमय तेजोवलाय(ऑरा) वाढविणारे
       
            औक्षण -ओवाळणे


Energy can neither be created nor destroyed; rather, it transforms from one form to another.
असे सांगितल्यास उत्तर येईल – “ हो न्यूटन चा नियम , माहीती आहे ”
पण –

ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
हे पूर्ण आहे आणि तेही पूर्ण आहे.पूर्णातून पूर्ण काढून घेतले असता पूर्णच उरते.
असे सांगितल्यास उत्तर येईल – “ हो माहीती आहे - एक पूजापाठ करताना म्हणायचा मंत्र आहे , I don’t believe this ”

अहो , न्यूटन तेच सांगतोय जे हजारो वर्षांपूर्वी ईशावास्य उपनिषद कर्त्यांनी सांगितलं.
देव किंवा परमात्मा म्हणालो तर आमचा विश्वास नाही आणि एनर्जी म्हणालो तर चालते काय ? एनर्जी ला उगम नाही आणि अंतही नाही हे पटते ! सत् - चित्-आनंद याचाही अर्थ तोच असून यावर विश्वास नाही  !
परमात्मा म्हणा वा एनर्जी – दोन्ही एकच “ अनादीअनंत ”
“ माझा देवावर विश्वास नाही  ” हे आताशा चालतं. पण " माझा उर्जेवर विश्वास नाही " असे एखाद्या शास्त्रज्ञांच्या परिषदेत म्हणून पहा.हकालपट्टीच होईल खास ! असो.
मनुष्य हा एक अनंत उर्जेच्या  कणांनी बनलेला उर्जेचा गोळामात्र आहे. त्याचे अस्तित्वही उर्जा आणि त्याच्या भोवतालीही एक उर्जाच विद्यमान आहे.ज्या उर्जेला नाव आहे  “ ऑरा ”
हा ऑरा जर संतुलीत असेल , तर आपले अस्तित्व संतुलीत ! हे कसे जमेल ? यावर विचार करत असताना (कदाचित्)आपल्या पूर्वजांना अनंत मार्ग सापडले – जसे स्तोत्र-मंत्र पठण , रुद्राक्ष व मंत्र धारण , अलंकार धारण , औषधी वनस्पती धारण . गंध व भस्म लेपन इ.इ.इ.
त्यातीलच एक महत्वाचा ’ऑरारक्षक ’ उपाय म्हणजे ’ ओवाळणे ’ अर्थात् ’ औक्षण करणे ’

कुणाचा वाढदिवस असेल,कुणी परीक्षेला चाललं असेल,कुणी महत्वाच्या कामावर चाललं असेल,कुणी काही विशेष पराक्रम करून परतलं असेल तर ’ ओवाळणे’ हा एक अगदी हमखास करावयाचा वैज्ञानिक विधी होता. आताही आहे , पण त्याचे अस्तित्व आता अंध:श्रद्धेपुरते राहीले आहे.
पण वस्तुस्थिती अशी आहे की जीवजंतू-बाधा-अरिष्ट यांपासून मानवाचे संरक्षण करणे हे औक्षण विधीचे काम आहे.

प्रतिकारक क्षमता अल्प असलेली लहान मुलं,सतत कामानिमित्त बाहेर असणारी घरातली कर्तीमंडळी यांना  So called Exposure पुष्कळ आहे. परीणामी त्यांच्या भोवतालचे उर्जावलय क्षीण होते.त्यामुळेच महाप्रचंड उर्जेचे लघु-रूप असलेल्या निरांजनाने – अक्षता-सुवर्ण-सुपारी इ.उर्जावस्तू वापरून अत्यंत सकारात्मकतेने आणि विशेष प्रेमादराने ज्यांचे हृदय ओथंबून आले आहे अशाच व्यक्तीने जर त्यांना ओवाळले तर आभावलय पुन्हा मजबूत होते आणि शरीरातील उर्जाकेंद्रे आणि सप्तचक्रे पुन्हा Activate होतात आणि व्यक्ती बरी होते, दुरूस्त होते आणि बाधामुक्त होते.
वारंवार आजारी पडणार्‍या आणि प्रतिकारशक्ती कमी असणार्‍या मुलांना अथवा मोठ्यांनासुद्धा या उपायाने आराम पडताना दिसतो. जरूर अनुभव घ्यावा.

श्रावणातलं पावसाळी वातावरण , आभाळी हवा आणि जीवजंतू व रोगराई यांचे वाढलेले प्रमाण , या सर्वांच्या पार्श्वभूमीवर बुधवारी-शुक्रवारी मुलांना ओवाळणे तसेच काही ना काही निमित्ताने पुन्हा-पुन्हा ओवाळणे हे विशेष संयुक्तीक आहे.
आयुष्यवान – आयुष्यमान – आयुष्यवंत अशा शब्दातून कदाचित्  औक्षण आणि औक्षवंत असे शब्द तयार झाले असावेत.
त्यामुळे घरातल्या सर्वांचे जर खरंच एकमेकांवर प्रेम असेल तर अगदी डोळसपणे काही प्रथा आपण पाळाव्यातच ! असे माझे स्वच्छ मत आहे.
त्यामागचे वैज्ञानिक तथ्य समजेपर्यंत कदाचित् उशीर होतो.म्हणून श्रावणाच्या पार्श्वभूमीवर ’ औक्षण ’ या विषयी लिहावेसे वाटले.

जिज्ञासू  आणि आक्षेप कर्त्यांचे स्वागत !  – पण ‘ Electro-somatographic scaning ’ या Test मधून प्राप्त निष्कर्षांचा अभ्यास असेल तर !!!

बाकीच्यांनी आवर्जून ओवाळून घ्या ! ओवाळा ! मोठं उर्जादायी काम आहे ते ! उर्जा अमूल्य आहे ! आणि हो ओवाळणीही घाला मोबदल्यात !

धन्यवाद !

डॉ. सुनील थिगळे
       ऑरा तज्ञ
सार्थक होलिस्टीक हेल्थकेअर सेन्टर
५,तारांगण सोसायटी पौडरोड
पुणे 411038
मो. 9595553007
 👌🏻

या पोस्टला उत्तर

तेजोमय तेजोवलाय(ऑरा) वाढविणारे औक्षण - ओवाळणे

Energy can neither be created nor destroyed; rather, it transforms from one form to another.
असे सांगितल्यास उत्तर येईल – “ हो न्यूटन चा नियम , माहीती आहे ”
पण – ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात्पुर्णमुदच्यते
पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॥
हे पूर्ण आहे आणि तेही पूर्ण आहे.पूर्णातून पूर्ण काढून घेतले असता पूर्णच उरते.
असे सांगितल्यास उत्तर येईल – “ हो माहीती आहे - एक पूजापाठ करताना म्हणायचा मंत्र आहे. I don’t believe this.
अहो, न्यूटन तेच सांगतोय जे हजारो वर्षांपूर्वी ईशावास्य उपनिषद कर्त्यांनी सांगितलं. देव किंवा परमात्मा म्हणालो तर आमचा विश्वास नाही आणि एनर्जी म्हणालो तर चालते काय? एनर्जी ला उगम नाही आणि अंतही नाही हे पटते! सत् - चित्आनंद याचाही अर्थ तोच असून यावर विश्वास नाही!
परमात्मा म्हणा वा एनर्जी दोन्ही एकच अनादीअनंत
- डॉ. सुनील थिगळे, ऑरा तज्ञ.

*उत्तर :*
सदर लेख लिहिणारी व्यक्ती कदाचित एकतर काल्पनिक ईश्र्वराचे अस्तित्व सिद्ध करण्यासाठी मुर्खतेचा कळस करतेय कींवा अवैज्ञानिक विचारधारा न्युटनच्या नावाखाली खपवण्याचा आटोकाट प्रयत्न करतेय. ती व्यक्ती असा लेख लिहुन स्वत: अतिविद्वान आहे असे दर्शवून, बाकीचे बावळट किवा मुर्ख आहेत असेच समजतेय. यात लेखकाने दोन मुद्दे लिहिलेत. पहिल्या मुद्द्यात त्याने उर्जेलाच काल्पनिक ईश्र्वराचे स्वरुप म्हटले व दुसऱ्या मुद्द्यात त्याने औक्षण हे वैज्ञानिक पातळीवर तर्कसंगत ठरवण्याचा फोल प्रयत्न केलाय. आणि या दोन्ही विज्ञान साठी त्यांनी छद्म विज्ञानाचा आधार घेतला आहे. आपण या दोन्ही मुद्द्यांवर जरा समिक्षा करुया...

पहिला मुद्दा, काल्पनिक ईश्वराची उर्जेशी तुलना करुन, त्याला ऊर्जे समान मानणे. स्वतःला तज्ञ म्हणवणार्‍या या महाविद्वान महाशयाची सगळ्यात मोठी चूक म्हणजे *उर्जा निर्माण करता येत नाही किवा नाशही पावत नाही, तर ती एका रुपातून दुसऱ्या रुपात परीवर्तीत करता येते, हा सिद्धांत सर्वप्रथम न्युटनने नव्हे तर Emilie du Chatelet (1706 - 1749) याने प्रयोगानीशी मांडला व सिद्ध केला.* त्याच्या आधी काही तत्ववेत्त्यांनी त्यावर संशोधनाचा प्रयत्न केला होता. हा प्रयत्न अगदी इ.स. पुर्व पाचव्या शतकापासुन म्हणजेच बुद्धांच्या काळापासून सुरु होता. पण त्यास ठोस स्वरुप दिले ते Albert Einstein ने १९०७ ला. उर्जा एका स्वरुपातून दुसऱ्या स्वरुपात परावर्तीत होताना, काही अंशी वाया जाते, हे त्याला आकाळले म्हणून आलबर्ट आईन्स्टाईनने सखोल अध्ययन करुन व सिद्धांत मांडून या संशोधनाला पुर्णविराम दिला. त्याने त्यासाठी एक सुत्र दिले, जे जगभरात विज्ञानात शिकवले जाते, E = mc^2.

आता आपण काल्पनिक ईश्र्वराची या ऊर्जेशी केलेली तुलना बघू. खरंच हास्यास्पद आहे, ही तुलना किवा समानता. गेली ५००० वर्षे, या देशात ब्राम्हणांनी सनातन वैदिक परंपरा निर्माण केली होती. या परंपरेनुसार गेल्या ५००० वर्षांत या देशात, याच वैदिक परंपरेच्या नावाखाली अब्जावधी ब्राम्हणेतर स्त्रियांना सतीच्या प्रथेखाली जिवंत जाळण्यात आले, पण एकाही स्त्रिचे रक्षण एकाही काल्पनिक देवाने केले नाही. तसेच गेल्या ५००० वर्षांत कोट्यावधी ब्राम्हण स्त्रियांचे पती निधनानंतर केशवपन केले गेले, एकाही स्त्रिला या विद्रुपतेपासून वाचवायला, एकही काल्पनिक देव पुढे आला नाही. या पुढची गोष्ट म्हणजे, गेली ५००० वर्षे याच सनातन धर्माने जाती व्यवस्था निर्माण करून ब्राम्हणेतरांचा शिक्षणाचा अधिकार व मनाप्रमाणे व्यवसाय आणि नोकरीचा अधिकार काढून घेतला. तसेच ब्राम्हणेतरांना संपत्ती संचयनाचा अधिकारही नाकारला. तसेच जो ज्या जातीत जन्माला, त्याने त्याच जातीप्रमाणे कार्य करायचे, अन्य कोणतेही उद्योग करायचे नाहीत, असे धर्मशास्त्रात लिहून कट्टर जातीव्यवस्था लादली. हे नष्ट करुन अधिकार द्यायला एकही काल्पनिक देव का पुढे आला नाही.

प्रबोधनकारांनी 'देवळाचा धर्म आणि धर्माची देवळे' या पुस्तकात लिहील्या प्रमाणे काही जातींवर आद्य शंकराचार्याने सातव्या शतकात अस्पृश्यता लादली, जे आजचे SC, ST, NT, DT, VJ आहेत, परंतु एकही काल्पनिक देव ही चुकीची व्यवस्था नष्ट करण्यासाठी ना पुढे आला, ना अवतरला. अगदी राजे शिवछत्रपतींसारख्या महान राजाची विषप्रयोगाने होणारी हत्याही, काल्पनिक देव वाचवू शकला नाही. या देशात इंग्रजांचे राज्य आले व  इ.स. १८२७ ला लाॅर्ड विलीयम बेंटीकने सतिप्रथेस कायद्याने बंदी घातली. न्हाव्यांचा संप घडवून केशवपन प्रथेस ज्योतिबांनी विरोध केला. तर बाबासाहेबांनी समाज सुधारणेचा कळस गाठला. त्यांनी ५००० वर्षांची सनातन जाती व्यवस्थाच मोडकळीस आणली व ब्राम्हणेतरांना शिक्षणाचे अधिकार, मनाप्रमाणे नोकरी व व्यवसायाचे अधिकार, तसेच संपत्ती संचयनाचे अधिकार दिले. स्त्रियांना शिक्षण, नोकरी, व्यवसाय, माहेर व सासरच्या संपत्तीत हिस्सेदारी, घटस्फोटाचे व पुनर्विवाहाचे अधिकार दिले.

दुर्दैव हेच की एकही काल्पनिक देव भारतीय समाजाला या जातीव्यवस्थेच्या दलदलीतून बाहेर काढू शकला नाही तसेच वरील अधिकार देण्यासाठी अवतरला नाही. या देशात दुर्दैवाने कृतघ्न लोकांची संख्या जास्त असल्यामुळे बाबासाहेबांच्या उपकाराची जाण त्यांना नाही, उलटपक्षी द्वेशच आहे. असो. हा ज्यांच्या त्यांच्या कुसंस्कारांचाच व अल्पबुद्धीचा भाग आहे. जवळजवळ सगळ्याच वैज्ञानिकांनी ईश्र्वराचे अस्तित्व नाकारले. कुणीही काल्पनिक ईश्वराला ऊर्जेचे प्रतिस्वरूप म्हणुन मांडण्याचा मुर्खपणाचा प्रयत्न केला नाही.

दुसरा अवैज्ञानिक मुद्दा, औक्षणाने सारे सभोवतालचे जिवजंतू मरतात. हे जर सत्य असेल तर ज्यांना हा आत्मघातकी सिद्धांत पटतो, त्यांनी आजच्या Corona च्या काळात मास्क न लावताच, घरातून स्वत:चे औक्षण करवून घेऊन थेट कोरोनाग्रस्त रुग्णांमध्ये कोणतीही अन्य सुरक्षा न घेता रुग्णांची सेवा करावी. त्यांनी  मास्क वापरू नये, सॅनिटायझर वापरू नये, कोरोनाचा PPT पोशाख घालू नये, केवळ स्वत:चे औक्षण करवून घेऊन थेट रुग्णसेवा करावी आणि स्वत:च्या या मुर्ख सिद्धांताचा प्रत्यय घ्यावा. नंतरच आपला अनुभव येथे मांडावा. उगाच छद्म विज्ञानाचा आधार घेऊन अंधश्रद्धा पसरवू नये.

सारेच ईश्वरवादी अंधभक्त बोलतात की, देवाच्या मर्जीशिवाय झाडाचे पानही हलत नाही. तर मग सध्याच्या कोरोनाला व त्यामुळे पसरलेल्या भयाला तसेच होणाऱ्या मृत्युंना तो काल्पनिक देवच जबाबदार असला पाहिजे- त्यांच्याच या सिद्धांतानुसार. राजे शिवछत्रपती व शंभुराजांची हत्या देखिल त्या काल्पनिक ईश्र्वराच्या मर्जीनेच झाली असली पाहिजे.

वरील मुद्द्यांवर केवळ ज्यांची सद् विवेक बुद्धी जागृत आहे, तेच विचार करतील व त्यांनाच ते पटेल... निर्बुद्धांना नाही.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?