पहिल्या शिक्षिका कोण?

 



पुढील अर्थाची एक पोस्ट प्रसारित होत आहे: 

*‘भारताला स्त्री शिक्षणाची प्राचीन परंपरा आहे’,* 

*‘गंगाबाई पहिल्या शिक्षिका’*  


‘अमेरिकन मराठी मिशन’च्या १८८२ साली प्रसिद्ध झालेल्या १८१३ ते १८८१च्या रिपोर्टचा संदर्भ देऊन या पोस्टमध्ये दावा केला आहे की, इंग्रज राजवटीत अनेक शिक्षिका कार्यरत होत्या.  गंगाबाई या इ.स. १८२४ दरम्यान मुलींची शाळा चालवत होत्या. गंगाबाई या मुंबईच्या मूळ रहिवासी होत्या. आगरी कोळी हे मुंबईचे मूळ रहिवासी होत. Native=मूळ रहिवासी, भूमिपुत्र. (म्हणून गंगाबाई या आगरी कोळी होत्या आणि त्या पहिल्या शिक्षिका होत्या असे म्हणायचे असावे!) 


अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणे म्हणजे काय, संदर्भ सोडून (out of context) कसे लिहावे याचे  वरील पोस्ट हे उदाहरण आहे. तसेच महात्मा फुले आणि सवित्रिमाई फुले यांच्यावरील राग, द्वेष, तिरस्कार  दर्शविण्यासाठी आणि त्यांचे कर्तृत्व कमी लेखण्यासाठी आगरी -कोळी समाजाचे  कार्ड वापरुन  हिंदुत्ववादी जाणीवपूर्वक  किती खालच्या थराला जाऊ शकतात, किती केविलवाणा प्रयत्न करू शकतात  याचेही वरील पोस्ट हे उदाहरण आहे. आता कसे ते पाहूया: 


१) ही पोस्ट बनवणार्‍यांना ‘अमेरिकन मराठी मिशन’ हा प्रकार बहुतेक मराठी बाण्याचा एखादा  प्रकार वाटत असावा. परंतु ही संस्था महाराष्ट्रात ख्रिस्ती धर्माचा प्रसार करणार्‍या अमेरिकन मिशनरी लोकांची संस्था आहे हे त्या १८८२ साली प्रसिद्ध झालेला आणि पोस्टकर्त्याने संदर्भ म्हणून वापरलेला रिपोर्ट (पुढील लिंक वर उपलब्ध आहे: https://ia600302.us.archive.org/27/items/memorialpapersof00amer/memorialpapersof00amer.pdf ) अगदी वरवर चाळला तरी लक्षात येते. एरवी ख्रिस्ती मिशनर्‍यांच्या नावाने सदैव शिमगा करणार्‍या या लोकांना सावित्रीमाईंचे श्रेय हिरावून घ्यायला मिशनर्‍याच्या कामाच्या रिपोर्टची मदत घ्यावी लागते. यावरून यांची बौद्धिक दिवाळखोरी दिसून येते. 

२) गंगाबाई या पहिल्या मुलींच्या शाळेच्या शिक्षिका होत्या हे सिद्ध करण्यासाठी जो रिपोर्ट मधील परिच्छेद दिला आहे, त्याच पानावरील त्याखालचाच परिच्छेद देणे मात्र या पोस्टकर्त्याने जाणीवपूर्वक टाळलेले दिसते. कारण तो परिच्छेद वरील दाव्याच्या सत्यतेवरच प्रश्न निर्माण करणारा आहे. तो मी पुढे देत आहे: 

We regret that no further mention is made of this Gangabai, the first

native woman employed in Bombay to teach a Christian school. How

did she herself learn to read? And in the face of the odium attaching

to such an occupation, where did she get the courage to enter upon it ?

How mysterious the stroke which called her away when she was the only one to be found who could and would teach this school !

(गंगाबाई या मुंबईतील ख्रिस्ती शाळेत शिकवण्यासाठी नेमलेल्या पहिल्या स्थानिक निवासी महिले विषयी अधिक माहिती दिली नाही त्या बद्दल आम्ही खेद व्यक्त करतो. ती स्वतः वाचायला कसे शिकली? या व्यवसायाकडे तिरस्काराने पाहिले जात असतांना तिच्याकडे त्यात येण्याचे धैर्य कोठून आले? या शाळेत शिकवू शकणारी  आणि शिकवणार असणारी ही एकमात्र महिला शोधण्यामागील रहस्य काय असावे!)  

३) या १८८२ सालच्या रिपोर्ट मधील परिच्छेदानुसार १८२४ साली (म्हणजे रिपोर्ट लिहिला त्याचा सुमारे ५८ वर्षांपूर्वी) ख्रिस्ती शाळेत शिकवायला ज्या  गंगाबई यांना नेमले होते त्या स्वतः कसे वाचायला शिकल्या, (त्या काळात हिंदू स्त्रियांना कडक  शिक्षण-बंदी होती) या व्यवसायाचा (शिक्षिकेची नोकरी, त्यातही ख्रिस्ती शाळेत) तिरस्कार होत असताना त्या यात कशा आल्या, शाळेत नेमण्यासाठी नेमक्या याच एकट्या कुठे सापडल्या याची काहीही माहिती या रिपोर्ट बनवणारास नाही. त्यामुळे या गंगाबाई यांच्या असण्यावरच प्रश्नचिन्ह उभे राहते.  पण वरील पोस्ट बनवणारास काय त्याचे? 

४) मूळ निवासी म्हणजे आगरी कोळी म्हणून गंगाबाई या आगरी कोळी होत्या हा निष्कर्षच चुकीचा आहे. कारण आगरी कोळी यांच्या सोबतच भंडारी हे देखील मूळ निवासी आहेत तसेच गेल्या आठशे वर्षांपासून पाठारे प्रभू देखील मुंबईचे निवासी आहेत. मग गंगाबाई या आगरी कोळीच होत्या हे कशावरून? त्या भंडारी असू शकतात, पाठारे प्रभू असू शकतात! 

५) ‘भारताला स्त्री शिक्षणाची *प्राचीन* परंपरा आहे’ असा दावा सिद्ध करण्यासाठी १९व्या शतकातील अमेरिकन मिशनरी लोकांच्या मुलींसाठी स्थापन केलेल्या कथित ख्रिस्ती शाळेत नेमल्या गेलेल्या   गंगाबाई या कथित शिक्षिकेचे उदाहरण द्यावे लागते. यावरून ‘प्राचीन’ हा शब्द कशाशी खातात याचा गंध देखील या पोस्टकर्त्यास नाही हे दिसून येते. 

६) गंगाबाई या पहिल्या शिक्षिका होत्या असे युक्तीवादासाठी मान्य केले तरी मग प्रश्न असा निर्माण होतो की सावित्रीमाई फुले यांच्यावर शेण गोळ्यांचा मारा करणारे सनातनी गंगाबाईंच्या वेळेस झोपा काढीत होते काय? सनातनी लोकांनी त्यांना विरोध केला नाही याचे कारण हे असू शकते की ही कथित मुलींची शाळा ख्रिस्ती लोकांची होती आणि या गंगाबाई  कदाचित ख्रिस्ती सुद्धा असू शकतात. कारण त्या काळात अनेक हिंदूंनी ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता.  त्या हिंदू असत्या तर सनातन्यांनी त्यांचे जगणे मुश्किल करून टाकले असते. आणि जर त्या हिंदू असतील आणि तरीही त्यांना सनातन्यांनी विरोध केला नसेल तर याचा अर्थ एक तर सनातन्यांचा मुलींच्या  ख्रिस्ती शाळेत हिंदू महिलेने शिकवण्याला  विरोध नव्हता किंवा ख्रिस्ती शाळांत शिकवणार्‍या हिंदू महिलेला विरोध करण्यास त्यांच्यात हिम्मत नव्हती. 

जोतिबा-सावित्री यांचे कार्य खरे तर समस्त हिंदू महिलांसाठी मुक्तीचा मार्ग ठरलेले असताना, ते सर्वमान्य असताना सुद्धा त्यास आजही सनातनी प्रवृत्तीचे हिंदू विरोध करत आहेत. यावरून जोतिबा-सावित्री यांचा मार्ग किती खडतर होता याची कल्पना येऊ शकते. असो, अशा पोस्ट्सचा समाचार घेतला गेलाच पाहिजे. म्हणून हा लेखन प्रपंच. 

उत्तम जोगदंड


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?