विदेशी झाडे का नकोत ?

विदेशी झाडे का नकोत ? -
मादागास्कर येथून भारतात आलेल्या गुलमोहराने, ऑॅस्ट्रेलियातून भारतात आणल्या गेलेल्या निलगिरी, १९७२ साली आयात केलेल्या गव्हा ( मिलो ) बरोबर भारतात आलेली  सुबाभूळ, पेल्ट्रोफोरम, अकेशिया, स्पॅथोडिया, कॅशिया, ग्लिरिसिडीया, फायकस , सप्तपर्णी , रेन ट्री या झाडांनी आज हजारो एकरांवर डेरा जमवून आपल्या आम्लयुक्त पानांमुळे आपल्या आसपासची जमीन नापीक केली आहे ....  दक्षिण अमेरिकेतून आपल्याकडे आलेल्या गव्हाबरोबर तिकडचे पार्थेनियम तण बीच्या स्वरूपात आपल्याकडे आले आणि स्थानिक पर्यावरणात या तणाने हाहाकार माजवला .... आपण त्याला गाजर गवत आणि काँग्रेस गवत म्हणतो ....  पण ह्याचे निर्मूलन काही आपल्याला करता आले नाही कारण हे स्थानिक तण नसल्याने त्याला खाऊन फस्त करणारे जीवच इथल्या स्थानिक अन्नसाखळीत नांदत नसल्याने, त्याची बेसुमार वाढ झाली .... अशा प्रकारे विदेशी झाडांची केलेली लागवड आपल्या जीवनचक्रावर परिणाम करत असल्याचे दिसत आहे ...
या झाडांच्या फुलात परागकण नाहीत त्यामुळे त्यावर फुलपाखरासारखे कीटक येत नाहीत ... या झाडांच्या मुळांनी जमिनीतील पाणी शोषून घेतल्याने पाण्याचे प्रमाण कमी झाले आहे ... या झाडांच्या पानांनी आणि सावलीने आपल्या जमिनी निकृष्ट केलेल्या आहेत ... या झाडांच्या फांद्यांचा, बुंध्यांचा उपयोग आपल्याला नाही ... रातकिडे, वटवाघूळ, चिमणी, घार, गिधाडे, गरुड, घुबड अशा सर्रास दिसणाऱ्या पक्षांचा वावर दुर्मिळ झाला आहे ... एकंदरीत अशा विदेशी झाडांवर होणाऱ्या परागकण प्रक्रियेला आणि पक्ष्यांद्वारे होणाऱ्या बीजप्रसाराच्या कामाला खीळ बसत असून कीटक, किडे, पक्षी जोडणारी निसर्गसाखळी / अन्नसाखळी कमकुवत होतेय ... परदेशी झाडाची पाने, फुले, शेंगा आपल्याकडील गाय ,बैल ,शेळीसुद्धा खात नाहीत .... माकडे देखील परदेशी झाडावर बसत नाहीत. म्हणजे मुक्या प्राण्यांना जे कळते की परदेशी झाडे घातक आहे ते आपल्याला अजून कळलेले नाही हेच मोठे दुर्देव याचमुळे निसर्गाच्या अन्नसाखळीत एकमेकांवर अवलंबून असलेले अनेक जीव नामशेष होण्याच्या मार्गाकडे ढकलले जात आहेत ... या प्राणी, पक्षी आणि वनस्पतींवर उपजीविका करणारे माकड, वाघ, हत्ती, बिबटे, गवे हे प्राणी अन्नाच्या शोधात मानवी वस्तीकडे येत आहेत ...
ग्लिरिसिडीया सारख्या झाडाच्या फुलावरून उंदीर, घुशी गेल्या तरी ते अपंग होतात ... मरतात ... या झाडाखालुन चालताना धाप लागते ... या झाडापासून विषारी वायु उत्सर्जित केला जातो त्यामुळे पावसाचे प्रमाण कमी होते .... जवळपास ९०% सरकारी जंगले व नर्सरी ग्लिरिसिडीयाने भरलेली आहेत ... १९७० च्या दशकात युरोपियन देशांनी जागतिक बॅंकेचे कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली तेव्हापासून आपल्याकडे ग्लिरिसिडीया हे झाड आले... तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे ...  फायकस या झाडाच्या पानाचा धुर घेतल्यास शरीर सुजते. परदेशी झाडांचे कोणतेही आयुर्वेदीक उपयोग नाहीत .त्यापासुन ऑक्सीजन देखील मिळत नाही ... जिथे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे .... इतक्या मोठ्याप्रमाणावर परदेशी झाडे लावली गेली आहेत आणि त्यांना मुद्दाम नीलमोहोर ,काशीद ,सप्तपर्णी अशी स्थानिक दिशाभुल करणारी नावे दिलेली आहेत की कोणते झाड परदेशी समजायचे असा गोंधळ निर्माण होतो यासाठी ज्या झाडांवर आपल्याकडील पक्षी बसत नाहीत आणि घरटी करत नाहीत ते झाड परदेशी समजावे ....
आता देशी झाडेच का लावायची ? याबद्दल
अश्वत्थमेकं पिचुमंदमेकं न्यग्रोधमेकं दशचिंचिणीकम।
 कपित्थबिल्वा मलकत्रयं च पंचाम्रवापी नरकं न पश्येत्।
अर्थात पिंपळ, कडुलिंब आणि वड यापैकी एक वृक्ष आणि चिंचेची दहा झाडे किंवा कवठ, बेल आणि आवळा यापैकी कोणत्याही जातीचे तीन वृक्ष आणि आंब्याची पाच झाडे जो लावेल, तो नरकात जाणार नाही. हे आपल्या पुराणात सांगून ठेवलेलं आहे ... वडाला, उंबराला देवाचा दर्जा दिला गेलाय ....    
देशी वृक्ष आपल्या जंगलात किंवा स्थानिक हिरव्या पट्टयात पर्यावरणाचा समतोल साधत असतात. त्यांच्या अस्तित्वाशी जुळवून घेतलेली, त्यावर जोपासली जाणारी सजीव व्यवस्था असते....  या सजीव व्यवस्थेत मनुष्य, प्राणी, पक्षी, कीडे, कीटक सामावलेले असतात.... पक्ष्यांना, किडयांना आणि कीटकांनाही अन्न, निवारा मिळतो ...  देशी झाडांच्या गळलेल्या पानांतून जमिनीवर जमणाऱ्या पाचोळयातून तयार होणाऱ्या खतातून जमिनीचा कस वाढत असतो... विघटन झालेल्या पालापाचोळयाच्या खतातून निर्माण होणारी पोषकद्रव्ये पुन्हा झाडाकडे पाठवण्याचे काम झाडांची दूरवर पसरणारी मुळे करत असतानाच खोलवर जाऊन ती जमिनीवरच्या मातीला धरून ठेवतात....  विविध कीटकांना, किडयांना आणि सरपटणाऱ्या जीवांना अशी उत्तम जमीन उपयुक्त ठरते आणि एक परिपूर्ण पर्यावरण निर्माण करते.... ऑक्सिजनचे आणि पावसाचे प्रमाण वाढते ... ढगांना पाऊस पाडण्यासाठी आवश्यक असलेला गारवा निर्माण करण्याची क्षमता आपल्या देशी झाडामध्ये आहे ... त्यांचे प्रमाण कमी झाल्याने अवकाळी पाउस, चुकलेले उन्हाळा, पावसाला, थंडी यांचे चक्र आपल्याला वेगाने विनाशाकडे घेवून जात आहे ....
देशी झाडांच्या फांद्या, ढोल्या या विविध पक्ष्यांचा निवारा बनतात.... साधारणपणे ३५० पेक्षा जास्त जातीची झाडे वटवाघळं निसर्गात रोपण करीत असतात यात आंबा, जांभूळ, चिकू, बोर, उंबर, वड, पिप्रण, नांदरूक, मोहा, सीताफळ, रामफळ अशी अनेक फळझाडे असून सर्वात अगोदर फळ पिकते हे वटवाघळाला समजते....  यात पाडाला पिकलेला आंबा सुरुवातीला वटवाघळे खातात आणि मग शेतकरी आंबे उतरवितो आणि मग आडी लावली जाते .... मुक्या प्राण्यांना हे कळते मग माणसाला कधी कळणार ...
पांगारा, सावर, सिताफळ, जांभुळ, कोकम, कडुनिंब, करंज, बहावा, उंबर, वड, पिंपळ, चिंच, आपटा, कांचन, बहावा, कदंब, फणस ,आवळा ,आंबा , कवठ, बेल,कडुनिंब ,मोह, पळस ही झाडे न लावता निव्वळ फोटोसाठी चुकीचे वृक्षारोपण करणाऱ्या लोकांना थांबविणे गरजेचे आहे....  अन्यथा हिरवळ दिसेल, मात्र जैवविविधता दिसणार नाही ...


*विदेशी झाडे का नकोत?*  *या लेखास उत्तर.*

आजकाल आपले भारतीय तेच चांगले व परदेशी ते सारे वाईट हे खर्‍या-खोट्या-अर्धसत्य मार्गाने सांगायची स्पर्धाच सुरू झालेली दिसते. त्याच मनोवृत्तीतून ही विदेशी झाडांविषयीची पोस्ट निर्माण झालेली दिसते आहे. या वेळेस या स्व-देशप्रेमी लोकांनी परदेशी झाडांना नाहक वेठीला धरलेले दिसत आहे.  या झाडांचा विकिपीडियावर धांडोळा घेऊन त्या प्रत्येक झाडाची लिंक सोबत दिलेली आहे. त्यातील मजकूर कोणीही वाचू शकतात.  त्या चाळल्या असता साधारणतः पुढील निष्कर्ष निघतात:
1) लेखकाने विदेशी झाडांबाबत काढलेले निष्कर्ष हे एखाद-दूसरा अपवाद वगळता पराचा कावळा करणे या सदरात मोडणारे आहेत.
2) यातील बहुसंख्य झाडे केवळ शोभेसाठीच आहेत असे नसून उपयुक्त सुद्धा आहेत. त्यांची पाने, फळे, लाकडे हे उपयोगी आहेत. यातील बहुसंख्य झाडांची पाने पशू खातात.
3) लेखक म्हणतात, त्या झाडांची पाने आम्लयुक्त आहेत व त्यामुळे आसपासची जमीन नापीक झाली आहे, यास कसलाही शास्त्रीय पुरावा नाही.  अपवाद गाजर गवत किंवा पार्थेनियम. या गवताने खरोखरच हाहाःकार निर्माण केला आहे. तसेच एक-दोन अन्य प्रजातींची मुळे दूरवर पसरून इतर झाडांना हानी पोहोचवतात. फायकस घरात लावल्यास अॅलर्जी होऊ शकते.
4) या झाडांच्या सावलीने व पानांमुळे जमीन निकृष्ट होते हा लेखकाचा सरसकट दावा बिनबुडाचा आहे.
5) निलगिरीसारखी काही झाडे पाणी काही प्रमाणात जास्त शोषून घेतात हे खरे मानले तरी, अन्य भारतीय झाडे बिन-पाण्याची जगतात असे नाही. खरे तर उसासारखे पीक प्रचंड पाणी पिऊन घेते या विषयी लेखक बोलत नाहीत.
6) यातील एक झाड (कॅशिया) तर भारतीयच आहे व ते आयुर्वेदानुसार उपयोगी सुद्धा आहे.
7) यातील अनेक झाडांची ती उपयुक्त असल्याने अन्य देशात जाणीवपूर्वक लागवड सुद्धा केली जाते.
8) सुबाभूळ झाडाच्या लागवडीसाठी आपल्या देशात मोहीम राबवली जात होती. एवढे ते झाड उपयोगी आहे.
9) ग्लिरिसिडीया हे उपयुक्त झाड आहे. चारा म्हणून सुद्धा वापरले जाते. ते जमिनीचा कस संतुलित करते. १९७० च्या दशकात युरोपियन देशांनी (झाड मेक्सिको येथील) जागतिक बॅंकेचे (अमेरिकेतली) कर्ज देण्यासाठी भारतासमोर ग्लिरिसिडीया हे झाड भारतीय जंगलात लावण्याची अट घातली ही लोणकढी थाप आहे कारण हे म्हणणे अतार्किक आहे व याचा पुरावा सापडत नाही. कर्ज हवे तर अमुक झाड लावा, यासारखे हास्यास्पद काही नाही. या झाडातून विषारी वायु निघतो याचा कसलाही पुरावा सापडत नाही. याच्या बियांपासून कीटक नाशके बनवतात परंतु याच्या फुलवरून चालल्याने उंदीर अपंग होतात याचा कसलाही पुरावा नाही. ग्लिरिसिडीया हे झाड आले... तेव्हापासून पावसाचे प्रमाण हळुहळु कमी झालेले आहे हा दावा सुद्धा बिनबुडाचा आहे व जसे काही संपूर्ण जंगले या झाडानेच व्यापली आहेत या गृहीतकवार आधारित आहे. खरे तर मुळात जंगले प्रचंड प्रमाणात तोडली गेली हे कमी पावसाचे मूळ असतांना त्याचे तिकीट या झाडावर फाडणे अत्यंत चुकीचे आहे.
10) परदेशी झाडातून ऑक्सीजन मिळत नाही हा दावा पूर्णतः खोटा आहे. सर्वच झाडे कमी अधिक प्रमाणात ऑक्सीजन सोडतात. रेन ट्री हे झाड तर प्रचंड प्रमाणात CO2 शोषून घेते.
11) यातील बहुसंख्य झाडे ही फुलझाडे सुद्धा आहेत. त्यात परागकण नाहीत या दाव्यास कसलाही पुरावा नाही. परागकण नसतील तर या झाडांचे पुनरुत्पादन कसे होते? हा प्रश्न लेखकास पडला नाही.
12) या झाडांवर पक्षांचा वावर सुद्धा असतो, यातील बर्‍याच प्रजातींच्या झाडावर पक्षांची अनेक घरटी पाहीलेली आहेत.
13) मुके प्राणी काही भारतीय वनस्पती सुद्धा खात नाहीत हे लेखकास माहिती नसावे. तसेच काही भारतीय वनस्पती सुद्धा विषारी किंवा अपायकारक असतात हे सुद्धा लेखकास माहिती नसावे याचे आश्चर्य वाटते.
14) लेखकाचा दावा ‘जिथे मोठ्या प्रमाणावर परदेशी झाडे आहेत तेथे फिरायला जाणाऱ्या नागरिकांमधे ह्रदय रोगाचे प्रमाण वाढलेले असल्याचे संशोधनावरुन सिध्द झालेले आहे’ हा कोणत्या व कोणी केलेल्या संशोधनावर आधारित आहे याचा पुरावा दिलेला नाही. तसेच ही विदेशी झाडे ज्या देशातील आहेत तिथे सुद्धा लोकांना हृदय विकार व्हायला हवा ना?
15) विश्व हे उत्क्रांतीच्या तत्वावर चालते. इथे परदेशातून आलेली झाडे इथल्या वातावरणासोबत जुळवून घेतील तसेच इथले प्राणी-वनस्पती जीवन या वनस्पतीसोबत जुळवून घेईल. टोमॅटो, मिरची, फ्लॉवर इत्यादि सारख्या विदेशी भाज्या अजून या लेखकांच्या तडाख्यात सापडल्या नाहीत याचे आश्चर्य वाटते.
16) सर्वच झाडे थंडावा निर्माण करतात व कोणतेही झाड पावसास अडथळा निर्माण करू शकेल असे विज्ञानाने अजून सिद्ध केलेले नाही.  
17) चेर्नोबिल हे शहर परमाणुभट्टीच्या स्फोटानंतर मोकळे केले गेले.  तिथे पुढील 20 हजार वर्षे मानव राहू शकणार नाही असे सांगितले गेले. परंतु नुकत्याच नॅशनल जिओग्राफिक चॅनल वर दाखवलेल्या डोक्युमेंटरिमध्ये तिथे गेल्या तीस वर्षात जंगलांची प्रचंड वाढ झालेली व तिथे विविध प्रकारचे प्राणी/पक्षी रहात असल्याचे दिसून आले आहे. तरी, लेखकाने विदेशी-गंडापासून स्वतःची सुटका करून घ्यावी व अशा प्रकारचे अतार्किक, अज्ञानमूलक निष्कर्ष काढू नयेत ही विनंती.

विदेशी झाडांच्या लिंक्स:
गुलमोहर ( https://en.wikipedia.org/wiki/Delonix_regia )

निलगिरी ( https://en.wikipedia.org/wiki/Eucalyptus )

सुबाभूळ ( https://en.wikipedia.org/wiki/Leucaena_leucocephala )

पेल्ट्रोफोरम ( https://en.wikipedia.org/wiki/Peltophorum_pterocarpum )

अकेशिया ( https://en.wikipedia.org/wiki/Acacia )

स्पॅथोडिया, ( https://en.wikipedia.org/wiki/Spathodea )

कॅशिया, ( https://en.wikipedia.org/wiki/Cassia_fistula )

फायकस ( https://en.wikipedia.org/wiki/Ficus_benjamina )

सप्तपर्णी ( https://en.wikipedia.org/wiki/Alstonia_scholaris )

रेन ट्री ( https://en.wikipedia.org/wiki/Samanea_saman )

पार्थेनियम ( https://en.wikipedia.org/wiki/Parthenium_hysterophorus )

ग्लिरिसिडीया ( https://en.wikipedia.org/wiki/Gliricidia_sepium )
 
नीलमोहोर  ( https://en.wikipedia.org/wiki/Jacaranda_mimosifolia )

काशीद ( https://en.wikipedia.org/wiki/Senna_siamea )


*चला उत्तर देऊ या टीम*

टिप्पण्या

  1. आपला ब्लॉग आज मला गुगलवर चिंचेबाबत माहिती शोधत असताना वाचावयास मिळाला. आपण विदेशी झाडे नको म्हणणरांना छान उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. परेदशी किंवा स्वदेशी सारेच छानही नसते आणि घाणही. आपल्या उततरात दोन बाबीबाबत मला नमूद करावेसे वाटले म्हणून हा टिपणी प्रपंच.
    आपण ग्लिरीसीडीयाचा वापर चारा म्हणून केला जातो असे लिहिले आहे. हे पूर्णत: चूक आहे. खडकाळ जमीनीवर मातीचा थर यावा आणि शेतीयोग्य जमिनीचे क्षेत्र वाढावे यासाठी या वनस्पतीचा उपयोग होतो. त्याच्या फांद्या वारंवार तोडून तेथेच कुजू दिल्यास जमिन सुपीक बनते. ते डोगरावर आणि खडकातही छान वाढते म्हणून त्याला गिरीपुष्प म्हणतात. तर मराठवाडा सोलापूरकडील लोक ज्वारीच्या शेतातील उंदरांच्या बिळात याची फुले आलेली फांदी घालतात. त्याच काळात या णाडाला फुले आलेली असतात.
    सुबाभूळ हे ही झाड म्हणून वाढवावयाचे नसते. १९७२च्या दुष्काळापर्यंत त्या झाडाला भारतात कुबाभूळ म्हणून ओळखले जात असे. त्या दुष्काळात तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी उरळी कांचन येथील दूध प्रकल्पाला भेट देण्यासाठी आल्या होत्या. दुष्काळ असतानाही तेथील जनावरे धष्टपूष्ट आहेत हे पाहून त्यांनी आश्चर्य व्यक्त केले. याचे गुपीत सांगताना डॉ. जयंत पाटील (कोसबाड येथील कृषी केंद्रातील संशोधक) यांनी सुबाभळीच्या शेतीची माहिती दिली आणि सुबाभळीला जनावरचे खाद्य म्हणून कसे वापरता येते हे दाखवत, ‘इसे तो लोग कुबाभूल कहते है लेकीन इस मुश्किल हालात मे हमारे लिए सुबाभूल है’. असे सांगितले. त्यानंतर त्या झाडाला इंदिराजीनी प्रथम सुबाभूल म्हणून जाहीर केले आणि त्याची मोठ्या प्रमाणात लागवड केली. मात्र जनावरांचे खाद्य म्हणून नाही तर झाड म्हणून.
    विदेशी झाडे चूकीच्या पद्धतीने आपण लावत असल्याने येथील जीवसृष्टीचे नुकसान होत नाही असेही नाही. आता ही दोन्ही झाडांचेच पाहिले तर त्यावर काळा मावा, चिलटवर्गीय किटक मोठ्या प्रमाणात वाढतात. ग्लिरीसिडीयाखाली जानेवारी महिन्यात गाडीही लावता येत नाही. त्यामुळे वैज्ञानिक दृष्टीकोनातून झाडाकडे पाहायला हवे हेच सत्य आहे.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?