ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता

मूळ पोस्ट

विज्ञानाचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते.

सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे (आणि यांना आपण विज्ञाननिष्ठ समजतो).

माऊलीं ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.

उदय-अस्ताचे प्रमाणे |
जैसे न चालता सूर्याचे चालणे |
तैसे नैष्कर्म्यत्व जाणे |
कर्मींचि असता ||

सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध  आहे.

मानवी जन्माची प्रक्रिया कसल्याही उपकरणाची मदत न घेता ज्ञानेश्वर महाराज जेव्हा सांगतात तेव्हा नामांकित डॉक्टरांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहात नाही. माऊली लिहितात,

शुक्र-शोणिताचा सांधा |
मिळता पाचांचा बांधा |
वायुतत्व दशधा |
एकचि झाले ||
 
शुक्र जंतू पुरुषाच्या वीर्यामध्ये असतात व शोणित पेशी स्त्रियांच्या बिजांड कोषात असतात. या शोणित पेशी अतिसूक्ष्मदर्शक यंत्राशिवाय दिसत नाहीत.

सूक्ष्मदर्शक यंत्राचा शोध चारशे वर्षांतील आहे. परंतु माऊलींनी कसल्याही सूक्ष्मदर्शकाच्या मदती-शिवाय शोणित पेशींचा उल्लेख केला आहे. इथे त्यांच्यातील सर्वज्ञता दिसते.
 
पृथ्वी सपाट आहे की गोल या प्रश्नावर शास्त्रज्ञांत बराच काळ वाद चालला होता. पृथ्वी गोल आहे हा सिद्धांत आता जगन्मान्य झाला आहे.

माऊली ज्ञानोबारायांनी ज्ञानेश्वरीमध्ये 725 वर्षापूर्वीच पृथ्वी गोल असल्याचे सांगितले.

पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा |
तरी हा भूगोलचि काखे सुवावा |
तैसा विस्तारू माझा पाहावा |
तरी जाणावे माते ||
 
भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. आणि पृथ्वी गोल असल्याचे निःसंदिग्ध सांगताना परमाणूचाही (Micro-Electron) स्पष्ट उल्लेख केलाय.
 
पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही शे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे.

परंतु माऊली ज्ञानोबाराय 725 वर्षांपूर्वीच सांगतात की, पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते.

तया उदकाचेनि आवेशे |
प्रगटले तेज लखलखीत दिसे |
मग तया विजेमाजी असे | सलील कायी ||
 
सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलिकडे शोधून काढली आहे. परंतु माऊली ज्ञानोबाराय ज्ञानेश्वरीमध्ये लिहितात की, सुर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो.
ती पावसाचे शास्त्रशुद्ध तंत्र सांगणारी ओवी अशी,

मी सूर्याचेनि वेषे |
तपे तै हे शोषे |
पाठी इंद्र होवोनि वर्षे |
मग पुढती भरे ||
 
विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे.

या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला या पोकळीत अस्तित्वात आहेत. विश्वाला अनंत हे विशेषण लावले जाते. या विश्वात अनंत ब्रम्हांडे आहेत म्हणून भगवान अनंतकोटी ब्रहांडनायक ठरतात. परंतु माऊलीं ज्ञानोबारायांनी 725 वर्षापूर्वीच सूर्यमालेतील मंगळ या ग्रहाबद्दल लिहिले आहे. विज्ञानाने शोध लावण्यापूर्वीच माऊली मंगळाचे

अस्तित्व सांगतात,
ना तरी भौमा नाम मंगळ |
रोहिणीते म्हणती जळ |
तैसा सुखप्रवाद बरळ | विषयांचा ||
किंवा
"जिये मंगळाचिये अंकुरी |
सवेचि अमंगळाची पडे पारी |
किंवा
ग्रहांमध्ये इंगळ |
तयाते म्हणति मंगळ |
   इतकेच नव्हे, तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत. रोहिणीचा वरच्या ओवीत आलाय, तसेच मूळ नक्षत्र:
परी जळो ते मूळ-नक्षत्री जैसे |
किंवा
 स्वाती नक्षत्र:
स्वातीचेनि पाणिये |
होती जरी मोतिये |
तरी अंगी सुंदराचिये |
का शोभति तिये ||
   
कॅमेरा आणि पडद्यावर दिसणारा चित्रपट यांचे मूळही ज्ञानेश्वरीत सापडते

जेथ हे संसारचित्र उमटे |
तो मनरूप पटु फाटे |
जैसे सरोवर आटे |
मग प्रतिमा नाही ||
 
अर्थात संकल्प-विकल्पांमुळे मनाचे चित्र उमटवणारा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. ते आटून गेले तर उमटत नाही.

या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता ध्यानात येईल.
विज्ञानयुगात दिशाभुल झालेल्या युवक-युवतींनी ज्ञानेश्वरीची ही शास्त्रीयता लक्षात घेऊन मानवी जीवनाचे यथार्थ दर्शन घडविण्या-या संत वाड़मयाच्या सहवासात यावे.
🚩🚩

या पोस्टला उत्तर
📖 *ज्ञानेश्वरीची वैज्ञानिकता(?)* 📖

सूर्य स्थिर आहे आणि पृथ्वी सूर्याभोवती फिरते हा शोध कोपर्निकसने लावला. त्याचा हा सिद्धांत बायबलविरोधी असल्याने धर्ममार्तंडांनी त्याचा छळ केला. कारण बायबलमध्ये पृथ्वी स्थिर असून सूर्य फिरतो असा उल्लेख आहे. ज्ञानेश्वरीने 725 वर्षापूर्वीच सूर्याचे भ्रमण हा भास आहे, हे वैज्ञानिक सत्य मांडले होते.विज्ञान युगाचा अभिमान धरणार्या मंडळींना ज्ञानेश्वरीने विज्ञानावर कशी मात केली आहे हे त्यातील काही ओव्यांवरून लक्षात येईल.अलीकडच्या काही शतकांमध्ये जे क्रांतीकारक शोध लागले आहेत, त्यांचे मूळ ज्ञानेश्वरीत सापडते.
_ही सगळी विधाने दिशाभूल करणारी असून त्यातून अंधभक्तांचे अर्धवट ज्ञानच दिसते. सर्वात पहिली गोष्ट कुठल्याही ओव्याचें संदर्भ क्रमांक दिलेले नाहीत. त्यामुळे त्या ओव्यांबद्दल साशंकतेला वाव राहातो. दुसरे म्हणजे ओव्यांचा अर्थ आपल्याला हवा तसा तोडून मोडून लावलेला दिसतो._
म्हणून खाली अंधभक्तांनी दिलेली मूळ ओवी आणि त्याचा त्यांनी लावलेला अर्थ देऊन नंतर त्याचे आम्ही योग्य स्पष्टीकरण  देत आहोत.

1) "उदय-अस्ताचे प्रमाणे,
जैसे न चालता सूर्याचे चालणे,
तैसे नैष्कर्म्यत्व जाणे,कर्मींचि असता".
सूर्य चालत नसून चालल्यासारखा दिसतो. सूर्याचे न चालता चालणे हा ज्ञानेश्वरीतील क्रांतीकारक शोध ठरत नाही काय? हे स्पष्टीकरण चुकीचे आहे.
*योग्य स्पष्टीकरण : पृथ्वी गोल असण्याबद्दलचे अंदाज आणि सूर्याभोवती फिरत असल्याबद्दलचे अंदाज आठव्या शतकातले आहेत. तसेच पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वी भोवती असा निष्कर्ष काढून आर्यभटाने ज्ञानेश्वरांच्या आधीच सांगून, ग्रहणे का होतात याचे स्पष्टीकरण दिले आहे.*

2) "पृथ्वीये परमाणूंचा उगाणा घ्यावा,
       तरी हा भूगोलचि काखे सुवावा,
तैसा विस्तारू माझा पाहावा,तरी जाणावे माते"
   भूगोल हा शब्दच ज्ञानेश्वरीने मराठीला दिला आहे. परमाणूचाही (Micro-Electron) स्पष्ट उल्लेख केलाय.
*योग्य स्पष्टीकरण : परमाणु म्हणजे सर्वात छोटा कण असे कणाद ऋषीनी ज्ञानेश्वरांच्या कित्येक शतके आधीच सांगून ठेवले आहे.*

3) "तया उदकाचेनि आवेशे,
प्रगटले तेज लखलखीत दिसे,
मग तया विजेमाजी असे,सलील कायी?".
पाण्याच्या घर्षणातून जलविद्युत निर्माण होते. हा विजेचा शोधही शे दिडशे वर्षांपूर्वीचा आहे.परंतु माऊली 725 वर्षांपूर्वीच सांगतात की, पाण्याचे जोरात घर्षण झाले की वीज तयार होते.पण
*योग्य स्पष्टीकरण : वीज हा शब्द आकाशातील विजेला आधीपासून होता .तेव्हा वीजेच्या स्वरूपाबद्दल ज्ञान नव्हते. जेव्हा वीजेचा शोध लागला तेव्हा आधीचाच शब्द उपयोगात आणला. जसे उडत्या वाहनाची कल्पना विमान नावाने केली होती आणि प्रत्यक्षात जेव्हा उडत्या वाहनाचा शोध लागला तेव्हा त्याला विमान म्हटले गेले.*

4) "मी सूर्याचेनि वेषे,तपे तै हे शोषे,
     पाठी इंद्र होवोनि वर्षे,मग पुढती भरे".
सागराच्या पाण्याची वाफ होते, त्याचे ढग बनतात व त्याला थंड हवा लागली की पाऊस पडतो. ही पाऊस पडण्याची प्रक्रिया विज्ञानाने अलिकडे शोधून काढली आहे. परंतु माऊली ज्ञानेश्वरीत लिहितात की, सुर्याच्या प्रखर उष्णतेने मी परमात्माच पाणी शोषून घेतो व त्या वाफेचे ढगात रूपांतर करतो व इंद्रदेवतेच्या रूपाने पाऊस पाडतो.
*योग्य स्पष्टीकरण : खरेतर पावसाच्या निर्मिती विषयक माहिती ज्ञानेश्वरांच्या आधीही ऋषीना माहीत होते.*

5) "ना तरी भौमा नाम मंगळ,
रोहिणीते म्हणती जळ,
तैसा सुखप्रवाद बरळ, विषयांचा"
किंवा "जिये मंगळाचिये अंकुरी,
सवेचि अमंगळाची पडे पारी"
किंवा "ग्रहांमध्ये इंगळ,
तयाते म्हणति मंगळ".
इतकेच नव्हे, तर नक्षत्रांचेही उल्लेख आहेत. रोहिणीचा वरच्या ओवीत आलाय, तसेच मूळ नक्षत्र:"परी जळो ते मूळ-नक्षत्री जैसे"
किंवा स्वाती नक्षत्र: "स्वातीचेनि पाणिये, होती जरी मोतिये, तरी अंगी सुंदराचिये, का शोभति तिये".
विज्ञानाला सूर्यमालेतील ग्रहांचा शोध लागला आहे.या विश्वाच्या पोकळीतील फक्त एकच सूर्यमाला मानवी बुद्धीला सापडली. अशा अनेक सूर्यमाला आहेत.
*योग्य स्पष्टीकरण : डोळ्यांना दिसणाऱ्या ग्राहगोलांची माहिती वेदकाळापासून ज्ञात आहे. वराहमिहीर, भास्कराचार्य,आर्यभटांनी आदी ऋषीनीही ग्रह, तारे आणि नक्षत्रांबद्दल ज्ञानेश्वरांच्या आधीच सांगितले आहे.*

6) "जेथ हे संसारचित्र उमटे,
तो मनरूप पटु फाटे,
जैसे सरोवर आटे,
मग प्रतिमा नाही".
अर्थात संकल्प-विकल्पांमुळे मनाचे चित्र उमटवणारा पडदा फाटून जातो. चित्रपटासाठी पडदा आवश्यक आहेच किंवा सरोवरात पाणी असेल तरच आपली प्रतिमा त्यामध्ये उमटते. ते आटून गेले तर उमटत नाही.
*योग्य स्पष्टीकरण : हा व्यवहारात दिसणाऱ्या घटनेला ओढून ताणून वैज्ञानिक रूप देण्याचा अट्टाहास आहे. जसे इंग्लंडमधील शहर बर्मिंगहॅम हा ब्राम्हणधाम या नावाचा अपभ्रंश आणि आपल्याकडे जसे ञ्यंबकेश्वर , महाबळेश्वर आहेत , यातील ईश्वर नावाचा अपभ्रंश शायर असा करुन इंग्लंडच्या विविध शहरांची नावे ठेवलेली लिसेस्टशायर , लंकेशायर इ.यातील लंकेशायर हे लंकेश्वर म्हणजे रामायणातील लंकेच्या नावावरुन आहे. किती हास्यास्पद आहे ते!तसेच ह्या ओवीचा हास्यास्पद अर्थ काढला आहे.*

या सर्व ओव्यांचा आशय लक्षात घेतला तर ज्ञानेश्वरांच्या ठिकाणी असलेली अंधभक्तीच दिसून येते, आणि विचारातील अवैज्ञानिकताही ध्यानात येते. *एवंच जे आधीच ऋषीमुनींना माहीत होते आणि तेच खरे पुरातन भारतीय शास्त्रज्ञ होते.तेव्हा त्यांचे ज्ञान पुढे न नेता नुसते गोडवे गाण्यात काय हशील आहे ?*

ज्ञानेश्वरांनी त्यांच्या ज्ञानेश्वरीत नवीन काहीच सांगितले नाही. जे ज्ञान आधीच अवगत होते, तेच फक्त काव्यात लिहिले. तेव्हा आंधभक्तांनो, अंधभक्तीतून बाहेर पडा, आणि पूर्वजांचे नुसतेच गोडवे गाण्याच्या ऐवजी प्रयत्नवादी व्हा, आणि वैज्ञानिक दृष्टीकोन आत्मसात करा म्हणजे तुमची खरी प्रगती होईल. (^m^) (^j^) (मनोगते)

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?