अध्यात्म आणि सायन्स

चला, आज पुन्हा एकदा एका खोटारड्या पोस्टचा समाचार घेऊया.
आधी ती पोस्ट वाचा आणि मग तिचे विश्लेषण वाचा. सुरुवातीला मूळची पोस्ट.
अवश्य वाचा.... .
अध्यात्म आणि सायन्स
!! श्री !!
देवळे अशाच ठिकाणी बांधलेली असतात जिथे प्रचंड शुभ उर्जा असते.
देवळे म्हणजे जणू काही ब्रम्हांडाचा/भवतालाचा पंचमहाभूतांसहीत असलेला छोटासा तुकडाच जणू.
सर्वसाधारणपणे जास्तीत जास्त शुभ उर्जेची जागा निश्चित झाली की तिथे खड्डा खणून त्यात एक तांब्याचा तुकडा टाकला जाई. तांबे हे वीज वचुंबकीय उर्जेचे उत्तम वाहक ( good conductors) आहेत हे आपल्याला माहित आहेच. त्यामुळे जास्तीत जास्त शुभ चुंबकिय वैश्विक उर्जा स्वतःत सामावून घेऊन नंतर ती भवतालात रेडीएट करणे हा तांब्याचा तुकडा मुर्तीखाली ठेवण्यामागचा प्रमुख उद्देश.
त्यानंतर विधीपूर्वक मुर्तीची प्रतिष्ठापना केली जाई व त्यानंतर त्याभोवी मंदिर बांधले जाई.
आता देवळात जातांना काय करावे, कसे दर्शन घ्यावे ह्याबाबत आपण जे नियम पूर्वापार पाळत आलो आहोत त्यातही 100% विज्ञान कसे आहे ते पाहू.
1) देवळात जाण्यापूर्वी आपण चपला/बूट काढून पाय धूवून मगच मंदिरात प्रवेश करतो........
ह्यामागे स्वच्छतेचे कारण आहेच, की आपण चपला/बूट घालून सर्वत्र फिरत असतो. मंदिरातील शुभ व पवित्र व्हायब्रेशन्स (positive & pure vibrations) दुषित होऊ नयेत हा एक उद्देश. पण त्याहीपेक्षा एक मोठे वैज्ञानिक सत्य यामागे दडलेले आहे. मंदिराच्या मध्यभिगातील फरशी अशी निवडलेली असे ( उदा. संगमरवर ) की ती मंदिरातील शूभ उर्जेची ती उत्तम वाहक ती असेलच पण आपण जेव्हा तिच्यावरुन अनवाणी (bare footed) चालू तेव्हा तळपायावर असलेल्या एनर्जी पाॅइंटस् मधून ती आपल्या शरिरात प्रवेश करेल.
जर तुमची पंच ज्ञानेद्रिये receiving mode मध्ये असतील तरच मदिरातील शुभ उर्जा तुम्ही स्वतःमध्ये सामावून घेउ शकाल,तेव्हा पुढचे नियम त्याकरीता..
2) मंदिराच्या गर्भगृहात/मूलस्थानाथ प्रवेश करण्यापूर्वी प्रवेशव्दाराशी असलेली घंटा वाजवणे......
ह्यामागेही दोन उद्देश आहेत.. पहिला म्हणजे.. ह्या घंटा विशिष्ट सप्तधातू योग्य प्रमाणात घेऊन बनविल्या जातात. घंटा वाविल्यानंतर ती तीव्र परंतू किमान सात सेकंद रहाणारा प्रतिध्वनित नाद निर्माण करतील अशा बनविल्या जातात. घंटा वाजवून पुढे निघून न जाता तिच्या खाली उभे राहून नादाची व्हायब्रेशन्स स्वतःमध्ये सामावून घेणे. ह्यामुळे आपली सप्तचक्र तर उद्दीपित होतातच,पण आपला उजवा व डावा मेंदू एकतानतेने ( inco-ordination) काम करु लागतात. तसेच आपल्या मनातील नकारात्मकविचारांचा निचराही होतो. गर्भगृहातील मूर्तीमध्येही ही व्हायब्रेशन्स शोषली जातात.
3) आपले पांच sences म्हणजे दृष्टी, ऐकणे, स्पर्श, चव घेणे, वासघेणे. यापुढील रुढी हे पांच सेन्सेस उद्दीपित करतात.
अ. कापूर जाळणे -- दृष्टी
ब. कापूरारतीवर हात फिरवून ते डोळ्याना लावणे... स्पर्श
क. मुर्तीवर फुले वाहणे...फुलांच्या अरोमामुळे वास.
क. कापूर व तुळशीपत्र घातलेलेतीर्थ प्राशन करणे..चव.
हे तीर्थ तांब्याच्या / चांदीच्या भांड्यात 8 तास ठेवलेले असते, त्यामुळे कफ- ताप असे आजारही जातात.
ड. घंटानाद व मंत्रोच्चरण....ऐकणे.
अशाप्रकारे उद्दीपित अवस्थेत व reveiving mode मध्ये आपण गर्भगृहातील आवश्यक तेवढी शुभ उर्जा स्वतःत सामावून घ्यायची असते.
मूर्तीच्या मागील बाजूस व भवतालात पसरलेली उर्जाही मिळावी म्हणून प्रदक्षिणेचे प्रयोजन..
पूर्वसुरी म्हणतात, हे सगळे केल्यावर पटकन गजबजाटात जाऊ नका. मंदिरात जरा वेळ टेका. शरिरात उर्जेला समावायला, settle व्हायला वेळ द्या आणि अत्यंत शांत मनाने, आनंदाने, उर्जापूर्ण अवस्थेत आपल्या कामाला जा.
मित्रमैत्रिणींनो आपल्या पुढच्या पिढीला देवळात कां जायचे हामोठ्ठा प्रश्न पडलेला असतो. ह्यापुढे देवळातजाण्यामागचा उद्देश लक्षात घेऊनच मंदिरात जा आणि पुढच्या पिढीपर्यत हे ज्ञान पोहोचवण्यासाठी मदत कराल हीच अपेक्षा..
शुभम् भवतु!
---------------------------------------------------
चला आता या पोस्टमधील खोटारडेपणा पहा.
सुरुवातीलाच 'छद्मविज्ञान' म्हणजे काय ते जरा जाणून घेऊया. छद्मविज्ञान म्हणजे खोटे विज्ञान. यात भाषा विज्ञानाच्या भाषेसारखी वापरलेली असते. परंतु त्या भाषेत सगळ्या अवैज्ञानिक गोष्टी सांगितल्या जातात. थोडक्यात वैज्ञानिक वाटणाऱ्या भाषेत सांगितल्या जाणाऱ्या अवैज्ञानिक (खोट्या) गोष्टी म्हणजे छद्मविज्ञान होय. सदरची पोस्ट म्हणजे छद्मविज्ञानाचा एक नमुना आहे.
१) या पोस्टमध्ये सुरुवातीलाच 'शुभ' ऊर्जेचा उल्लेख आहे. प्रत्यक्षात ऊर्जेचे जे प्रकार आहेत, त्यात शुभ ऊर्जा, अशुभ ऊर्जा असे प्रकारच नाहीत. याचा अर्थ 'शुभ ऊर्जा' नावाची ऊर्जा नसतेच मुळी. म्हणजे पुढची संपूर्ण पोस्टच खोटी ठरते.
२) तांब्याचा तुकडा (अस्तित्वात नसलेली) शुभ ऊर्जा ग्रहण करतो आणि ती रेडिएट करतो हे म्हणणे तर एकदम हास्यास्पद आहे. प्रत्येक पदार्थ ऊर्जा ग्रहण आणि उत्सर्जन करत असतो. या दोन्ही प्रक्रिया करण्याची प्रत्येक पदार्थाची क्षमता वेगवेगळी असते. तांब्यापेक्षा चांदी, सोने या धातूंमध्ये ती क्षमता जास्त असते. तथाकथित शुभ ऊर्जेचे उत्सर्जन करण्यासाठी तांब्यापेक्षा सोने-चांदी या धातूंचा उपयोग जास्त केला जायला हवा होता. पण जिथे उर्जाच खोटी तिथे तिचे उत्सर्जन सुद्धा खोटेच ना.
३) मंदिरात शुभ आणि पवित्र व्हायब्रेशन्स असतात ही आणखी एक थाप आहे. मुळात शुभ आणि पवित्र व्हायब्रेशन्स हा प्रकार विज्ञानात नाहीच. त्यामुळे ती चप्पल घातल्याने दूषित होणे शक्यच नाही.
४) आपल्या तळपायात 'एनर्जी पॉईंट' नावाचा कोणताही अवयव नसतो. त्यामुळे त्याद्वारे शरीराने तथाकथित शुभ ऊर्जा ग्रहण करण्याचा प्रश्नच नाही.
५) शरीरात सप्तचक्रे असण्याची कल्पना देखील अवैज्ञानिक आहे. आपल्या शरीरात अशी कोणतीही चक्रे नसतात. त्यामुळे घंटा वाजवून ती उद्दीपित होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.
६) घंटा वाजवल्याने नकारात्मक विचारांचा निचरा होतो या विधानाला विज्ञानाचा घंटा आधार नाही.
७) आमच्या देशात वर्षानुवर्षे चांदीच्या/
तांब्याच्या भांड्यातील तीर्थ प्राशन केले जात आहे. तरीही इथले कफ-तापाचे आजार संपले नाहीत.
८) तुम्ही मंदिरात जात नसाल किंवा कमी प्रमाणात जात असाल तर तुमचे काहीच नुकसान होत नाही. परंतु त्यामुळे काहीजनांची दुकानदारी बंद पडते. ती बंद पडू नये म्हणून तुम्हाला पुन्हा मंदिराकडे वळवण्यासाठी अशा खोटारड्या पोस्ट लिहिल्या जातात. तेव्हा अशा पोस्ट्स पासून सावध राहावे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?