लिंबू , मिरची, बिब्बा गाडीला का बांधतात?

*लिंबू , मिरची, बिब्बा गाडीला का बांधतात?*

ज्या काळात वाहनांचा शोध लागला नव्हता त्या काळात लोक बैल गाडीतून प्रवास करीत असत. मैलो मैलाच्या या प्रवासात बैलगाडीला लिंबू , मिरची , बिब्बा हा एका टोकदार तारेत ओवून गाडीच्या अश्या भागात बांधत की तो लगेच लोकांचा निदर्शनात पडेल किंवा प्रत्येक घराच्या बाहेर हे टांगले जात असे जेणे करून घरासमोरून जाणाऱ्या वाटसरूना तो लगेच मिळेल.

पण हे का? असा प्रश्न आता तुम्हालाही पडला असेल.

*लिंबू*
मैलोन मैल चालत असताना माणसाला तहान लागल्यास पाणी उपलब्ध न झाल्यास लिंबू तोंडात पिळून तोंडात लाळ निर्माण करण्यात येते ज्यामुळे माणसाची तहान तात्पुरती क्षमावता येवू शकते.

*मिरची* त्या काळी साप नाग यांचा वावर फार मोठा होता, म्हणून चालत जाताना एखादा साप चावल्यास त्याला मिरची खायला देत जेणे करून हा साप विषारी होता कि बिनविषारी ह्याची माहित मिळे. जर साप चावला असताना मिरची तिखट लागली तर साप बिनविषारी होता आणि तिखट नाही लागली कि साप हा विषारी होता,असा अंदाज बांधला जात असे.

*बिब्बा* हा उत्कृष्ट एंटीबायोटीक समजला जातो म्हणून जखम झाल्यास , कापल्यास बिब्बा लावला जात असे आणि हे सगळे एका टोकदार तारेत ओवले जात असे जी तार पायातला काटा काढण्यास उपयोगात येई.

अश्या प्रकारे हा प्रथमोपचार बैल गाडीवर , घराच्या दर्शनी भागात लावला जात कारण त्याचा उपयोग प्रथमोपचारासाठी होई. पुढे वाहने आली आणि हा प्रथमोपचार एक अंधश्रद्धा बनून अजून ही चालू आहे. या *प्रथमोपचारपद्धतीची कशी अंधश्रद्धा झाली ह्याची माहिती पोहोचावी हा एकच उद्देश !*

====================


*“लिंबू मिरची बांधण्याची प्रथा कशी सुरु झाली ? काय आहे नेमके कारण”* या पोस्टला उत्तर :

वरील पोस्ट वाचल्यावर पुढील प्रमाणे काही प्रश्न/मुद्दे उपस्थित होतात :

१) तहान लागल्यावर लिंबू पिळून लाळ निर्माण करण्या पेक्षा लिंबू मिर्ची ऐवजी एक तांब्याभर पाणी बैलगाडीत का ठेवू शकत नव्हते? तसेच लिंबू वाळून गेल्यावर ते तोंडात कसे पिळणार?

२) विषारी सापाचे विष दोन प्रकारचे असते. एक मज्जासंस्थेवर परिणाम करणारे व दुसरे रक्तावर परिणाम  करुन रक्तवाहिन्यात गुठळया निर्माण करणारे. मज्जासंस्थेवर परिणाम करणारे विष असेल तर आंबट तिखट चव एक वेळ ओळखू शकणार नाही. पण रक्तावर परिणाम करणारे विष असेल तर मात्र चव ओळखणार, याचा परिणाम आपण विष नाही असे समाजून बेसावध राहून त्या व्यक्तीच्या मृत्यूला कारणीभूत होणार, नाही का? आणि समजा चव ओळखली नाही (मज्जासंस्थेवर परिणाम करणारा साप चावल्याने) हे लक्षात आल्यावर तरी काय करणार?

३) गंजलेल्या तारेत बिब्बा, लिंबू ओवले की रासायनिक अभिक्रिया होणारच. तसेच जी तथाकथित टोकदार तार असते ती सुई एवढी टोकदार नसते, ज्या योगे पायात रूतलेला काटा काढता येईल. आणि बैलगाडीतून प्रवास करतांना पायात काटा कसा रुतेल?

४) पूर्वी लोक केवळ बैलगाडीनेच प्रवास करत असे नाही. जे लोक दूरवर पायी प्रवास करायचे, किंवा घोड्यावरून प्रवास करायचे त्यांचे काय? ते स्वतःला किंवा घोड्याला पण असे लिंबू मिरची बांधायचे का?

५) मिरची हा पदार्थ भारतात १६व्या शतकात पोर्तुगीजांनी आणला.  त्या आधी लिंबासोबत मिरचीच्या जागी काय लटकवले जायचे?

खरे तर साप चावला की लवकरात लवकर डॉक्टरी उपाय करून घेणे जरुरीची असते. जेवढे लवकर डाँक्टरकडे जावू तेवढे रुग्ण वाचण्याची शक्यता जास्त असते.
त्यावेळी त्या लोकांना वाटत होते, त्यांच्या ज्ञानाची मर्यादा लक्षात घ्या. आधुनिक विज्ञान वापरुन कृती करावी. उगीचच भाकड कथांना ज्ञान/विज्ञानाची जोड देण्याचा प्रयत्न करू नये.
*चला उत्तर देऊ या टीम*

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?