पितृपक्षात कावळ्यासच का खाऊ घातले जाते?


मूळ पोस्ट अशी आहे

श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते...🤔 या मागील मुख्य हेतू शास्त्रीयदृष्ट्या जाणून घेऊया.

जगात प्रत्येक झाड हे प्राणवायुचे उत्सर्जन करत असते. पण केवळ वड व पिंपळ हे दोन वृक्ष इतर झाडांपेक्षा एकाच वेळी दुपटीने प्राणवायु उत्सर्जन करतात. हे सर्व शास्त्रज्ञांनी मान्य केलेले आहे.
जगात सर्व झाडांची रोपे बीज प्रक्रियेद्वारा मनुष्य लाऊ शकतो परंतु फक्त वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही. या दोन्ही झाडांची कोमल अंकुर स्वरूपातील फळं जेव्हा कावळे खातात, ( बघा त्यातही म्हटले आहे केवळ *कावळेच*, इतर कोणताही पक्षी नाही.) तेव्हा त्यांच्या पोटातच ही प्रक्रिया सुरु होते आणि ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळ हे वृक्ष येतात.

या कावळ्यांशिवाय ही झाडे टिकणार नाहीत व कावळ्यांचे अंडी घालणे (प्रजनन) हे भाद्रपद महिन्यातच होते. त्यामुळे त्यांना घरोघरी पोषक आहार या काळात प्रत्येकाने दिला तरच हे सृष्टीचक्र व्यवस्थित चालेल हे पूर्वीच्या संतांनी, शास्त्रकारांनी जाणले होते.

आपल्या संस्कृतीतील ऋषि-मुनि हे अत्यंत बुद्धिमान आणि सखोल विद्वान होते. माणसांच्या आरोग्यासाठी ही दोन झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत म्हणून या वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरु करण्यात आली. आपली पूर्वापार चालत आलेली जीवनशैली ही पर्यावरणपुरक आणि शास्त्रावर आधारलेली आहे फक्त ती समजून घ्यायची आपली कुवत कमी पडते म्हणून आपण वेड्यासारखं पितृपक्ष आला की कावळ्यावर टुकार विनोद करून एकमेकाला पाठवण्यातच धन्यता मानतो... *हे वैज्ञानिक स्पष्टीकरण वाचल्यावर आपले विचार बदलतील हीच माफक अपेक्षा.....*
         ======================================

'श्राध्द केले की, कावळ्यासच का खाऊ घातले जाते...' या अवैज्ञानिक आणि दिशाभूल करणार्‍या पोस्टला उत्तर: 

१) केवळ वड आणि पिंपळ दुपटीने प्राणवायू उत्सर्जन करतात या लेखकाच्या विधानास कसलाही वैज्ञानिक आधार नाही. कोणत्या शास्त्रज्ञांनी हे मान्य केले आहे याचे पुरावे लेखकाने दिलेले नाहीत, देऊ ही शकणार नाही. कारण हे ‘ठोकून’ दिलेले विधान आहे.  
२) वड व पिंपळ या दोनच वृक्षांची प्रत्यक्ष बीज निर्मिती नाही हे लेखकाचे म्हणते धादांत खोटे आहे. दोन्ही झाडांना छोटी फळे येतात आणि त्यात बी असते. गूगल करून पहा, सचित्र माहिती मिळेल. 
३) लेखकांचा दावा आहे की *अंकुर* स्वरूपातील फळं जेव्हा कावळे’च’ खातात आणि ते जेथे विष्ठा करतात तेथेच वड किंवा पिंपळाचे झाड येते. परंतु ‘अंकुर’ स्वरुपातील फळे ही परिपक्व नसतात त्यामुळे अशा कच्च्या फळातील बी मधून दुसरे झाड येऊ शकत नाही. कावळे जिथे विष्ठा करू शकत नाहीत अशा ठिकाणी सुद्धा ही झाडे भिंतीत वगैरे उगवतात. कारण वार्‍याद्वारे सुद्धा हे बीज पसरते आणि अंकुरित होते. 
४) माणसांच्या आरोग्यासाठी ही दोन झाडे अत्यंत उपयोगी व आवश्यक आहेत असे लेखक म्हणतात. परंतु सर्वच झाडे माणसांच्या आरोग्यासाठी  आवश्यक आणि उपयोगी आहेत. 
५) लेखक म्हणतात कावळ्यांचे प्रजनन भाद्रपद महिन्यात होते ते बरोबर नाही. खरे तर ते जून - जुलै महिन्यात होते. पितृपक्ष त्यांतर खूप उशिरा येतो. 
६) कावळ्यांना पोषक आहार निसर्गातून मिळतो. तेच त्यांचे खाद्य असते. मानवी आहार (तेही भाताचे गोळे) हे पक्ष्यांचे खाद्य असू शकत नाही. अशा प्रकारे त्यांना मानवी आहार देणे हे त्यांच्या नैसर्गिक सवयी बिघडवणारे आहे.  
७) वृक्षांचे संवर्धन होण्यासाठीच पोषक आहार कावळ्यांना देण्याची प्रथा सुरु करण्यात आली हे लेखकाचे म्हणणे हास्यास्पद आहे. कावळ्यांनी भाताच्या गोळ्यांना चोच लावल्यावर वृक्षांचे संवर्धन कसे होईल?  
८) ऋषि-मुनि यांनी कावळ्यांना आहार देण्याची प्रथा अशासाठी सुरू केली की त्यांच्या मते आपले पूर्वज कावळ्याचा रूपाने येतात आणि हे अन्न खातात. असल्या टुकार समजूतींमुळे जर त्यावर विनोद असतील तर तो दोष या समजूतींचा आहे. 
९) कोणाची या बाबतीत श्रद्धा असेल तर तो वेगळा प्रश्न आहे. परंतु या श्रद्धेला ओढून ताणून, खोटी माहिती देऊन विज्ञानाशी जोडणे हा आचारटपणा आहे. तो करून तोंडघशी पडू नये.

टिप्पण्या

  1. चपखल खुलासा, मूळ पोस्टची पुराव्यासह पोलखोल

    उत्तर द्याहटवा
  2. आणि एक दिवस कावळ्याला खायला देऊन , कावळे धश्ट पुष्ट होणार नाहीत आणि वरील काही खरे होणार नाही...
    मुद्दे सूद मांडणी .. मस्त...

    उत्तर द्याहटवा
  3. अगदी बरोबर आहे. कावळेच का? संत गाडगेबाबा म्हणतात त्याप्रमाणे पीकांवर कावळे बसतात त्यावेळी गोफणीतुन दगडफेक का?

    उत्तर द्याहटवा
  4. सर्वात महत्त्वाचे: ज्यांना या प्रथा पटत नाही त्यांनी इतरांना आत्मविश्‍वासाने हे सांगावे. आपण स्वतः त्या प्रथा पाळत नाही नां, याची 'खरोखर' खात्री करून घ्यावी. मी तरी अशा प्रथा नाहीच पाळत. बऱ्याच जणांना बुद्धीच्या स्तरावर या गोष्टी पटतात परंतु कृतीच्या स्तरावर सामाजिक दबावाखाली येऊन प्रवाहात गुपचूप चालत राहतात.

    उत्तर द्याहटवा
  5. मग रक्षा विसर्जन वेळी कावळेच का येतात...?कारण(शास्त्रीय) मिळावं....!!

    उत्तर द्याहटवा
  6. आपन या पोस्टचे कुठून संदर्भ घेतला आहे, कळू शकेल का?

    उत्तर द्याहटवा
  7. वडाचे पान आकाराने मोठे व गर्द हिरव्या रंगाचे असल्याने प्रकाश संश्लेषण ईतर झाडाच्या तुलनेत अधिक होते सहजच प्राणवायू जास्त उत्सर्जित करते त्यामुळे च शालेय परिसरात वटवृक्ष वाढवण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते. पर्यावरण संवर्धन हाच हेतू साधला जातो.

    उत्तर द्याहटवा
  8. प्रथा सर्वच निरर्थक नाहीत त्यामागचे विचार वैज्ञानिक पातळीवर पडताळणी करावी.

    उत्तर द्याहटवा
  9. ओढून ताणून विज्ञान आहे असे भासवून कालबाह्य,अनिष्ट रुढी-परंपरा यांचे समर्थन करणे यालाच छदमविज्ञान म्हणतात.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

प्राणप्रतिष्ठा करताना आरसा आपोआप कसा फुटतो?

चांभारानी गणपती शिवल्यामुळे गणपती बाटला..?

हिंदूंच्या लग्नातील ह्या गोष्टी माहीत आहेत का?